आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा होऊन मोठा कालावधी लोटला तरी अद्याप स्पर्धेत विजयी व सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र मिळालेले नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रेस गुण दिले जातात. खेळाडूंना वेळेत प्रमाणपत्र मिळाले नाही तर ते गुणांपासून वंचित राहण्याचा धोका असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. यंदा शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाविषयी गोंधळाची स्थिती होती. मोठ्या विलंबाने शासनाने स्पर्धा घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार ऑगस्ट महिन्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धा शाळा, तालुका व जिल्हास्तरावर झाल्या.
तालुकास्तरावरील स्पर्धेत एक ते दीड हजार तर जिल्हास्तरावरील स्पर्धेत एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय स्पर्धा संपल्या आहे. दुसरीकडे जिल्हास्तरावरून विभागीयस्तरावर पात्र ठरलेले व राज्यस्तरावर पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या आता विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहे. तालुका व जिल्हास्तरीय खेळाडूंच्या आता विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहे. तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या व सहभाग घेतलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून अद्यापही प्रमाणपत्र मिळालेले नाही. या प्रमाणपत्राच्या आधारे दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळतात. बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होतील. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र मिळाले नाही तर विद्यार्थी ग्रेस गुणांना मुकण्याची शक्यता आहे.
किती मिळतात गुण
शासन निर्णयाप्रमाणे सहावी ते दहावी किंवा सहावी ते बारावीपर्यंत क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या खेळाडूला जिल्हास्तरावरील प्रावीण्यासाठी ५ गुण, विभागस्तरावरील प्रावीण्यासाठी १० गुण, राज्यस्तरावरील प्रावीण्यासाठी १२ ते १५ गुण, राष्ट्रीयस्तरावरील प्रावीण्यासाठी २० गुण तर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रावीण्यासाठी सवलतीचे २५ गुण दिले जातात. कोरोना कालावधीत दहावी-बारावीतील सहभागाऐवजी आठवी, नववी व अकरावीतील सहभाग गृहीत धरून खेळाडूंना सवलतीचे गुण मिळाले. तसेच दोन वर्ष स्पर्धा झालेल्या नाही.
चालू वर्षी खेळाडूंना गुण मिळणार असून त्यासाठी शाळेच्या माध्यमातून शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव वेळेत सादर होणे आवश्यक आहे. तसे झाले तर विद्यार्थ्यांना लाभ होईल.
त्या खेळाडूंनाही प्रतीक्षा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल, मॅरेथॉनसह मैदानी स्पर्धा झाली. सायकल व मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र मिळाले पण मैदानी स्पर्धेत सहभागी ८०० खेळाडूंना प्रमाणपत्र व पारितोषिकाची रक्कम मिळालेली नाही. या स्पर्धा होऊन आठ महिने झाले आहे.
विभागाकडे पाठपुरावा
जिल्ह्यात तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या आहे. पण अद्याप खेळाडूंना प्रमाणपत्र मिळाले नाही. प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही तर खेळाडूंचे नुकसान होऊ शकते. प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- डॉ. आनंद पवार, राज्य उपाध्यक्ष, क्रीडा शिक्षक महासंघ
का झाला प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विलंब
शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राष्ट्रीय पातळीवर पेच निर्माण झाल्यामुळे स्पर्धा घेण्यास विलंब झाला. एकाच वेळेस सर्व स्पर्धा सुरू झाल्या. त्याचबरोबर तालुका व जिल्हास्तरावरील स्पर्धा संपत नाही तोच विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन सुरू झाले. तसेच आता शहरात खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्यामुळे क्रीडा विभागाचे अधिकारी या स्पर्धेच्या नियोजनात गुंतले आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रमाणपत्र वितरणास विलंब होतो आहे.
पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना करणार सूचना
तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्यावर कामाचा व्याप वाढला. पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र काढून ते खेळाडूंना देण्याचे आदेश दिले आहे. सर्व खेळाडूंना मुदतीत प्रमाणपत्र मिळतील. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत प्रमाणपत्र वितरित करावे. - आसाराम जाधव, जिल्हा क्रीडाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.