आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत सखाराम महाराज आणि विठुनामाचा जयघोष करीत अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची पायी वारी बुधवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील तुळशीबागेतून वारकऱ्यांनी प्रस्थान केले. ही दिंडी २३ दिवसांत ५५० किमीचा प्रवास करणार आहे.
आषाढी वारीनिमित्त सखाराम महाराज संस्थानची पालखी विठुरायाच्या दर्शनाला जाणार म्हणून बुधवारी सकाळपासून या परिसरात टाळ-मृदंगाचा गजर निनादत होता. सकाळी सहा वाजता वाडी संस्थान येथील पैलाड भागातील तुळशीबागेत प्रसाद महाराज यांच्या हस्ते विठुरायाला तुळशीपत्र अर्पण करण्यात आले. शुभ्र कपडे, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीमाळ, खांद्यावर भगवा ध्वज व मुखी विठ्ठलाचा जप करीत २०० हून अधिक वारकरी प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे रवाना झाले. तत्पूर्वी महिला-पुरुष भाविकांनी रिंगण करून ढोल-ताशांच्या वाद्यावर ठेका धरला. दिंडी पंढरपूरला ८ जुलैला पोहोचेल.
वारींच्या स्वागताचा मान
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरला पोहोचणाऱ्या मानाच्या वाऱ्यांचे स्वागत करण्याचा मान अमळनेरच्या वाडी संस्थानला दिला आहे. त्यामुळे या संस्थानला राज्यातील वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. दशमीला ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीचे स्वागत करण्याचा मान संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.