आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारते आहे. हा प्रकल्प ३० टन क्षमतेचा असून, त्याचे वरखेडी रोडवरील कचरा डेपो येथे काम सुरू झाले आहे. याठिकाणी प्रत्येकी १० टनाचे तीन स्वतंत्र युनिट उभारले जाणार आहे. शहरातील कचरा संकलनासाठी मनपाने ठेकेदार नेमला आहे. सर्व कचरा संकलित करून तो वरखेडी रोडवरील कचरा डेपोत टाकला जातो. कचरा डेपोत बायोमायनिंगचे कामही सुरू आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या गांडूळ खत प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते.
आता शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे गांडूळ खत प्रकल्पाच्या शेजारी बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या कामाचा ठेका देण्यात आला आहे. प्रकल्पात दिवसाला २ हजार क्युबिक मीटर गॅसची निर्मिती होणार आहे. गॅस साठवण्यासाठी दोन टँक उभारण्यात येतील. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार असून, प्रकल्प सुरू झाल्यावर ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वरखेडी रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोत मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. या ठिकाणी कचरा ठेवण्यास जागा नसल्याने कचऱ्यावर प्रक्रिया होते आहे.
रोज ६० टन ओला कचरा
शहरासह महापालिकेच्या हद्दीत आलेल्या दहा गावांतून रोज सरासरी ६० टन ओला कचरा संकलित होतो. त्यातील शिळ्या अन्नापासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पात निर्मित होणाऱ्या बायोगॅसचा वापर कशासाठी करायचा याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येते आहे. या अभियानांतर्गत काही ठिकाणी वॉर्डातील कचरा वॉर्डात नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.