आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर:नवापूर शहरासह ग्रामीणमध्ये 14 तास राहणार भारनियमन; ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना वीज कंपनीने दिला ‘शॉक’

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज वितरण कंपनीने शहर व उपकेंद्रात भारनियमन वेळापत्रक प्रकाशित केले आहे. यात नवापूर शहर व ग्रामीण भागात तब्बल १३ व १४ तास भारनियमन दोन टप्प्यात राहणार आहे. यामुळे ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा फटका बसणार आहे. तर ऐन सणासुदीच्या व परीक्षांचे काळात नवापूर शहरासह तालुक्यात विजेचे भारनियमन वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

नवापूर शहरात गेले काही वर्षे विजेचे भारनियमन नव्हते. तर ग्रामीण भागात भारनियमन कमी होते; परंतु बुधवारपासून भारनियमनात अचानक वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरीदेखील भारनियमनामुळे त्रस्त होणार. नवापूर शहरात भारनियमनामुळे पाणीपुरवठावरदेखील परिणाम होणार आहे. नागरिकांना काहीअंशी पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

नवापूर शहरात दोन टप्प्यात १४ तास भारनियमन सुरू आहे. तसेच ग्रामीण भागातदेखील भारनियमन सुरू आहे. दिवसाच्या भारनियमन काळात विविध व्यवसाय ठप्प होत असून, ऑनलाइन असलेले बँक व विविध शासकीय कार्यलयातील कामकाज बंद पडत आहेत. तर रात्रीच्या भारनियमनाने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू झाल्याने भारनियमनाचा परिणाम मुस्लिम बांधवांवरदेखील होणार आहे. भारनियमन त्वरित बंद करून सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रमजान दरम्यान अनेक अडचणी
पहाटे चार वाजेला मुस्लिम बांधवांना उठावे लागते. त्यात सहरी व नमाज पठण असते. तसेच पाण्याची समस्या निर्माण होते. या दरम्यान सकाळी साडेपाचला लाइट जाते. संध्याकाळी उपवास सोडण्याच्या वेळेस लाइट साडेसहाला जाते. त्यामुळे मोर्चा काढून आंदोलन करू.
-जाकीर पठाण, प्रदेश सदस्य, भाजप अल्पसंख्याक मोर्चा, नवापूर

सध्या भारनियमनाची वेळ दिली आहे; परंतु ती निश्चित नाही
सध्या विजेची मागणी वाढली आणि वीज निर्मितीत मात्र फार मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे भारनियमनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आम्ही किती युनिट ग्राहकांपर्यंत दिले, त्यातून किती युनिटचे बिल झाले आणि किती युनिटचे पैसे आम्हाला रिटर्न आले. त्यानुसार वसुली कमी वीज गळती जास्त त्या वाहिनीवर भारनियमन जास्त, असे धोरण कंपनीचे आहे. सध्या भारनियमनाची वेळ दिली आहे; परंतु ती निश्चित राहणार नाही.
-हेमंत बनसोड, उपकार्यकारी अभियंता, नवापूर