आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका विधायक समितीच्या माध्यमिक आश्रम शाळेतील अनिता पाटील या शिक्षिकेने वेध प्रकल्पात स्वत:ला झोकून देत दोन वर्षांत तब्बल २०३ आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. या मुलांना वाचन, लिखाण, पाढे म्हणण्यात पारंगत केले. आश्रम शाळा म्हणजे राहण्याचे आणि खाण्याचे ठिकाण, असा दृष्टीकोन समाजाचा आहे.
तो वेध प्रकल्पामुळे बदलण्यात शिक्षिकेला यश मिळाले. त्या आता या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या आहेत. खोडाईमाता रोडवर समितीची आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळा आहे. तेथे इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेतात. सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांतील शिक्षणाची विदारक स्थिती सुधारण्यासाठी वेध प्रकल्पाची सुरुवात केली. त्यासाठी सर्वच आश्रम शाळेतील शिक्षकांना, शिक्षणाची परिस्थिती सुधारून दाखवाच, असे आव्हान दिले.
वेध प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यातून सकारात्मक परिणाम दिसला. जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय ६१ आश्रम शाळा असून यात नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षिका अनिता पाटील यांनी वेध प्रकल्पाचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:स या प्रकल्पात झोकून दिले. परिणामी २०३ विद्यार्थ्यांना आता उत्तम लिहिता, वाचता येऊ लागले आहे.
हे विद्यार्थी गणितही तेवढ्यात तन्मयतेने सोडवतात. त्यामुळे अनिता पाटील यांना शिक्षिकी पेशात काम करताना नवा हुरूप मिळाला. त्यांच्या कार्याची दखल घेत गतवर्षी प्रजासत्ताक दिनी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते त्यांचा गाैरवही करण्यात आला हाेता. अनिता पाटील यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळण्याची अपेक्षा आहे.
अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाची गाेडी
कोरोना काळात विद्यार्थी अभ्यासात कच्चे होते. वेध प्रकल्पामुळे हे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले. मुख्याध्यापक पी.सी. पाटील यांचे सहकार्य लाभले. करण धर्मा जगताप, गायत्री गुलाब जगताप, भावना कोकणी या विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी आल्या. त्यांना काहीच येत नव्हते. मात्र आज त्यांना शिक्षणाची गोडी लागल्याने मी समाधानी आहे. अनिता बापूराव पाटील, शिक्षिका, नंदुरबार.
विद्यार्थ्यांशी चर्चेतूनच विद्यार्थी शिकतात गणित
शिक्षिका अनिता पाटील या आता सहावीच्या विद्यार्थ्यांना ‘वेध’च्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. समजपूर्वक वाचन, स्वत: मुलांनी शिकावे, शिक्षकाची केवळ मार्गदर्शनापुरती मदत, प्रारंभिक गट, अक्षर गट, शब्द गट, परिच्छेद गट अशा गटांत विद्यार्थ्यांची विभागणी केली जाते. गणितात एक ते नऊ पाढा, १० ते ९९ पाढा, यानंतर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा पद्धतीने गणित विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना चर्चेतून शिकवले जातात. हुशार विद्यार्थी शिक्षणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यास शिकवतो. यात मैत्रीपूर्ण भाव निर्माण होऊन विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असल्याचे वेध प्रकल्पात दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.