आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा संकल्प:भाजपत एक पद, एक व्यक्तीचा प्रघात असताना डाॅ.गावितांच्या घरात तीन-तीन पदे कशी दिली; उदेसिंग पाडवींचा सवाल

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपत एक व्यक्ती एक असा प्रघात असताना डाॅ.विजयकुमार गावित यांच्या एकाच घरात खासदार, मंत्री आणि मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्यात आले. आता कुमुदिनी गावित यांनाही ते पालिकेच्या अध्यक्षपदासाठी उभे करू शकतात. मात्र हे कसे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी पक्षाच्या मंथन शिबिरात उपस्थित केला.

गत विधानसभा निवडणुकीत १५ दिवसांत डॉ.गावितांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तरी मला ५० हजारांहून अधिक मते पडली. येत्या विधानसभेत मी शहादा-तळाेदा मतदार संघातून माझा पुत्र आमदार राजेश पाडवी विरुद्ध लढणार असून ही लढाई पिता-पुत्रांची नव्हे तर विचारांची असेल. यातून माघार घेणार नसल्याचेही पाडवी म्हणाले.

रविवारी शहरातील मदर टेरेसा इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पक्ष निरीक्षक नाना महाले यांच्या अध्यक्षतेत हा मेळावा पार पडला. त्यात नगरच्या सिंधू तुपकरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.अश्विनी जोशी, युवक जिल्हाध्यक्ष राऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, माजी नगरसेवक माेहन माळी, कमलेश चौधरी, समन्वयक सीमा सोनगरे, सुरेंद्र कुवर, रायुकाँचे अध्यक्ष बबलू कदमबांडे, लल्ला मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत दाेन आमदारांचे लक्ष्य
प्रदेश उपाध्यक्ष पाडवी म्हणाले की, चंदू भैय्या माझे मित्र आहेत. त्यांना पालिकेच्या निवडणुकीत खेचून आणू. तळोदा पालिकेत पक्षाचीच सत्ता येईल. आगामी निवडणुकीत मी पक्षाच्या वतीने शहादा मतदार संघातून लढेल. माझ्या मुलाच्या विरोधात नव्हे तर विचारांची लढाई लढेल. त्यातून माघार घेणार नाही. एकनाथ खडसे यांचा कार्यकर्ता होतो म्हणूनच गेल्या निवडणुकीत भाजपने मला डावलले.

माझ्या मुलाला आणि एकनाथ खडसे यांच्या मुलीला तिकीट दिल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्य पक्षाच्या तुलनेत आमचा पक्ष कमकुवत असला तरी येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून दोन आमदार देण्याचे लक्ष्य आहे. स्वबळावर सर्व नगरपालिका निवडणूक लढवण्याचीही आमची तयारी असल्याचे पक्ष निरीक्षक नाना महालेंनी सांगितले.

भाजपचा विजय हा ईव्हीएमचा घोटाळा
गुजरातमध्ये भाजपचा विजय हा ईव्हीएमचा घोटाळा आहे. नाशिकमध्ये मीही या घोटाळ्याचा बळी ठरलो. भाजप हा धनाढ्य लोकांचा पक्ष झाला आहे. बोगस ईव्हीएममुळे भाजपचे उमेदवार निवडून आले. महाराष्ट्रात वाचाळ वीरांची रोज काहीना काही बडबड सुरू आहे. -नाना महाले, पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...