आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानरेगाचे कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची केवळ ६६ कामेच सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. तर रोजगार हमी योजनांसारख्या महत्वाच्या खात्यात अकार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक कुठल्या आधारावर करण्यात आली? शिक्षण विभागात एकाच जागेवर अकार्यक्षम अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने वर्षानुवर्ष आहेत, असा संतप्त सवाल करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यात पदे रिक्त असून ज्यांच्याकडे क्षमता नाही, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आल्याने सभागृहात अधिकारी, पदाधिकारी निशब्द झाले.
अनेक पदे रिक्त असल्याने प्रभारी पदभार अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपवल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती गणेश पराडके, शंकर पाडवी, महिला व बाल कल्याण सभापती संगीता भरत गावित, मुख्याधिकारी रघुनाथ गावडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोजगार हमी योजना, शिक्षण विभागासारखा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर आहे. यामागे गौडबंगाल काय?असा सवाल जि.प.सदस्य भरत गावित यांनी विचारला.
उपशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी क्लासवन अधिकाऱ्यांकडे हवी. पण तसे दिसत नाही. या मागे कारण काय? असा सवालही या वेळी करण्यात आला. सूर्यवंशी यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी आहे. यांच्या पेक्षा सक्षम अधिकारी नाही का? असा प्रश्न भरत गावित यांनी विचारला. ग्रामीण भागात स्मशानभूमी खासगी शेत जमीनीवर आहे. याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. तसेच ज्या गावात स्मशानभूमी नाही, तेथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राया मावची यांनी केली. तसेच पंतप्रधान आवास योजनेचे रजिस्ट्रेशन झालेले नसल्याने पहिला १५ हजाराचा हप्ता प्राप्त झाला नाही, अशी माहिती या वेळी त्यांनी दिली.
लंपी उपाययोजनेसाठी ३८ लाखास मंजुरी
पशुधनातील लंपी आजार नियंत्रणासाठी औषधोपचारासाठी ३८ लाख रुपयांच्या नियोजित खर्चाला मंजुरी देण्यात आली. तसेच आदिवासी उपयोजनांतर्गत शेळ्या मेंढ्यांना जंतनाशक योजना राबवण्यासाठी ४५ लाख रुपयांची तरतुद करण्याला सभेने मान्यता दिली. ऐश्वर्या रावल यांनीही डॉक्टरांच्या रिक्त पदाच्या संदर्भात तसेच कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला न्याय मिळावा, असे मुद्दे मांडले.
विधन परिषदेसाठी सरपंच, सदस्यांनाही मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव
विधान परिषदेसाठी सभापती, नगरसेवक, जि.प.अध्यक्ष, सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. सरपंच, सदस्यांना तो अधिकार देण्यात यावा, असा ठराव पारित करून तो राज्य शासनाकडे पाठवावा, असेही राया मावची यांनी सूचना केली. या संदर्भात ठराव पारित करून तो अहवाल पाठवण्यात यावा, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.