आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनानंतर बालमनोविकारातही 20 % वाढ; माेबाइल अतिवापराने एकलकाेंडेपणा वाढला

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील ताणतणाव, आर्थिक अडचणी, कोरोना काळात आलेला एकलकोंडेपणा, मोबाइलच्या अतिवापरामुळे बालमनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जळगावात गेल्या काही दिवसांपासून बालमनोरुग्णांच्या संख्येत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण घरात होता. त्याचे दुष्परिणाम होत मुलांमध्ये एकलकोंडेपणा, मोबाइलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी घरात संवाद वाढवून मोबाइल स्वतः बाजूला ठेवला, असे जीएमसीच्या मनोविकार विभागाच्या प्रमुख डॉ. पूर्वा मणेरीकर यांनी सांगितले.

पालकांमधील विसंवाद चिंतेचे आहे कारण
लहान मुलांना कुठली जबाबदारी नसली तरी त्यांच्यावर मानसिक ताणतणाव येतो. सभोवतालच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटना, घरामध्ये होणारे संवाद व घडामोडींवरती मुलांचं लक्ष असते. या घटनांचा व घडामोडींचा परिणाम या बालमनावर पटकन होतो. पालकांतील विसंवाद व चिंता हेही मुलांच्या मनावर परिणाम करते. लॉकडाऊननंतर घरांमध्ये आलेल्या आर्थिक अडचणी व याबद्दल चर्चा करणाऱ्या आई-वडिलांच्या गप्पा ऐकून मुलांच्या मनावरही परिणाम हाेताे.

ही आहे मुलांमध्ये दिसणारी प्रमुख लक्षणे
आई-वडिलांचे न ऐकणं, चिडचिड करणं, मध्येच हिंसक वागणं, विनाकारण त्रास, राग येणे, चिडचिड करणे, बडबड करणे, किंवा अगदी शांत राहणं यासारखी लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात येते आहे.

ही आहेत कारणे
कोरोना काळात मुलांची लिहिण्याची, वाचण्याची सवय तुटली, शाळेत बसण्याच्या सवयी तुटल्या, जुना अभ्यास राहिला, बॅकलॉग काढायचा आहे, मोबाइलचा अतिवापर, घरगुती भांडण, आई-वडिलांचे भांडण, घरातील आर्थिक चणचण, पालक करत असलेली चिंता इत्यादी गोष्टींचा परिणाम मुलांच्या बालमनावर होतो.

बातम्या आणखी आहेत...