आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजराच्या गळ्यातली घंटा:मांजरांच्या निर्बिजीकरणावर प्रत्येकी 2 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव‎; जळगाव मनपाच्या सभेत येणार प्रस्ताव

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या‎ किती तीव्र आहे, हे नव्याने सांगायची गरज‎ नाही. १५ महिन्यांत शहरातील नागरिकांना‎ भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या ५६५७‎ घटना घडल्या. त्या तुलनेत मांजराने चावा‎ घेतल्यामुळे उपचार करवून घेण्यासाठी ११७‎ जण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहेत.

त्यांनी‎ मनपाकडे तक्रार केलेली नाही. म्हणजे‎ यातील बहुतांश मांजरी पाळीव असण्याचीच‎ शक्यता आहे. मांजरींची संख्या कुत्र्यांच्या‎ तुलनेत कमी आहे, तसेच त्यांचा आकारही‎ लहान आहे. पण त्यांच्या निर्बिजीकरणावर‎ होणारा खर्च मात्र कुत्र्यांपेक्षा दुपटीहून अधिक‎ आहे.

मंगळवारच्या महासभेत येतोय शासकीय प्रस्ताव

एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणास मनपा‎ ९३८ रुपये खर्च करते. मांजरीसाठी मात्र तोच‎ खर्च २००० रुपये होणार आहे. जळगाव‎ जळगाव शहरात किती भटक्या मांजरी आहेत,‎ याची कोणतीही आकडेवारी‎ महानगरपालिकेकडे नाही. वर्षभरात मांजर‎ चावल्यामुळे उपचारासाठी जाणाऱ्यांची संख्या‎ केवळ ११७ आहे. त्यापैकी एकानेही तक्रार‎ केलेली नसल्यामुळे चावलेल्या मांजरी या‎ पाळीव असण्याचीच शक्यता अधिक आहे.‎ तरीही येत्या महासभेत भटक्या मांजरींचे‎ निर्बिजीकरण करण्यासाठी प्रत्येक मांजरीमागे‎ दोन हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव‎ मांडला जाणार आहे.‎

भटक्या कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरांवर‎ नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य‎ संस्थांनी त्यांच्या निर्बिजीकरणाची माेहीम‎ राबवावी, असे निर्देश थेट राज्य शासनाने जारी ‎केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची ‎ जबाबदारी महापालिका प्रशासनाची‎ असल्यामुळे प्रशासनाने एक प्रस्ताव ‎ ‎ महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेसमोर‎ सादर केला आहे.

त्यात एका भटक्या‎ मांजराच्या निर्बिजीकरणावर दोन हजार रुपये‎ खर्च येईल, असे नमूद करण्यात आले आहे. ‎ ‎महासभेत पदाधिकारी आणि नगरसेवक या ‎ विषयावर काय भूमिका घेतात, यावर या‎ कामावर सर्वसामान्य जळगावकरांचा किती‎ पैसा खर्ची पडतो, हे ठरणार आहे.

‎तज्ज्ञ म्हणतात‎ मांजरापेक्षा कुत्रा‎ धाेकादायक

‎पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलिंद पाटील व पशुपापा असाेसिएशनच्या अध्यक्षा खुशबू श्रीश्रीमाळ‎ यांच्या म्हणण्यानुसार कुत्रा एकाच ठिकाणी राहताे मात्र मांजर ही जागा बदलत असते. मांजराने चावा‎ घेण्याच्या घटनाही खुपच कमी असतात. त्यामुळे प्रशासनाने आधी कुत्र्यांची संख्या कमी करावी.

‎घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे‎

घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे अशी‎ एक म्हण मराठी भाषेत प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्यय‎ मनपाला या नव्या शासकीय आदेशाने येतो आहे.‎ भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी‎ महापालिका अनेक वर्षांपासून लाखो रुपये खर्च‎ करते आहे. पण अजूनही ही समस्या कायम आहे .‎ त्यातच सरकारकडून हा नवा आदेश आला असून‎ प्रशासनाने तो चेंडू महासभेच्या कोर्टात ढकलला.‎