आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेळीपट्ट्यात गेल्या १५ दिवसांपासून वादळाने नुकसान झालेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्याचवेळी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी त्यांना काही घेणे देणे नाही, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल चौधरी यांनी केला. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेरात शुक्रवारी, बैलगाडी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले, त्यावेळी चौधरी बोलत होते. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बैलगाडी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छोरिया मार्केटजवळून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर समारोप झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, खतांच्या किमती कमी कराव्यात, रात्रीऐवजी दिवसा उच्च दाबाने दहा तास वीजपुरवठा, या मागण्या होत्या. सुरेश पाटील, राजेंद्र महाजन, गणेश बोरसे, योगेश पाटील, अविनाश पाटील, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
२५ बैलगाड्यांचा सहभाग... शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या बैलगाडी जनआक्रोश मोर्चात २५ बैलगाड्यांवर शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजेपासून परिसरातील शेतकरी व प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी छोरिया मार्केटमध्ये बैलगाड्या आणण्यास सुरुवात केली होती. घोषणांनी स्टेशन रोड दणाणून गेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.