आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. राज्यातही त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात तरुणांनी शांतता व सुव्यवस्था राखावी यासाठी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी नुकतीच प्रत्येक जिल्ह्याचे पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांची ऑनलाइन बैठक घेऊन सूचना केल्या आहेेत. त्यानंतर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पावणेदोन मिनिटांचा व्हिडिओ शेअर करून तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
‘अग्निपथ कही जीवन को लथपथ न कर दे, अग्निमार्ग नही अहिंसा मार्ग से किजीए आंदोलन’ या वाक्याने व्हिडिओची सुरुवात केली आहे. यात पोलिस, सैन्य दलात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना विशेष करून आवाहन करण्यात आले आहे. इतर राज्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सहभागी होऊ नका. या योजनेच्या संदर्भात आपल्या मागण्या, सूचना, बदल सुचवायचे असल्यास सनदशीर मार्गाने परवानगी घेऊन आंदोलन करा, निवेदन द्या. हिंसक आंदोलनात सहभाग आढळून आल्यास त्यांची नोंद घेतली जाईल. आक्षेप नोंदवले जातील. त्यामुळे पोलिस, सैन्यासह कोणत्याही सरकारी नोकरीत आपण पात्र ठरणार नाही असाही उल्लेख डॉ. मुंढे यांनी केला आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या सूचना
पोलिस महासंचालकांनी दिलेल्या सूचनानंतर पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी लागलीच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही तरुण अशा प्रकारे आंदोलनाची तयारी करीत असल्यास त्यांची माहिती घेऊन त्वरित प्रतिबंध करावा, असे कळवण्यात आले आहे. गाेपनीय शाखांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. त्यानुसार पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती ही देण्यात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.