आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉटसिटी भुसावळात वैशाख वणवा पेटला आहे. सलग पाचव्या दिवशीही शहराचे कमाल तापमान ४२ अंशांच्या वर राहिले. तर शुक्रवारी शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४५.७ अंश तापमानाची नोंद केंद्रीय जल आयोगाने केली आहे. सूर्य आग ओकत असल्याने शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठ भागातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत असून अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. तापमानात १३ मे पर्यंत पुन्हा वाढीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
हॉटसिटी भुसावळातील तापमानाचा पारा एप्रिल महिन्याच्या अखेरीस ३६ अंशांपर्यंत घसरला होता. तर गेल्या रविवारी दि. ७ तापमान ४०.५ अंशांवर होते. सोमवारपासून तापमानात प्रचंड वाढ झाली. सलग पाचव्या दिवशीही शहराचे तापमान ४२ अंशांच्या वर आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४५.७ अंशांवर पोहोचला. तर किमान तापमान २७.२ अंशांवर पोहोचल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने केली आहे. शहरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा तडाखा वाढतो. यामुळे दुपारी १२ वाजेनंतर बाजारपेठेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्राहकच नसल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सायंकाळी सात वाजेनंतर रस्त्यांवर गर्दी दिसून आली.
१६ टक्क्यांपर्यंत घसरली आर्द्रता
तापीकाठावर वसलेल्या भुसावळ शहरातील वातावरणात उन्हाळ्यातही २० टक्क्यांपर्यंत आर्द्रता असते. मात्र सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे आर्द्रतेमध्येही घट झाली आहे. शहरातील वातावरणात शुक्रवारी दि. १२ रोजी आर्द्रता १६ टक्क्यांपर्यंत घसरली होती. कोरडे वातावरण असल्याने उष्णतेच्या चटक्यांत वाढ झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.