आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:पथदिवे नसल्याने अंधार,‎ साेनसाखळी लांबवली

जळगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक भागात पथदिवे‎ नसल्याने चाेरटे अंधाराचा‎ गैरफायदा घेत आहेत. १० मार्च रोजी‎ रात्री ९.१५ वाजता शतपावली‎ करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील‎ दीड लाख रुपयांची तीन तोळे वजन‎ असलेली सोनसाखळी ओढून दोन‎ चोरटे पसार झाले. जिल्हा उद्योग‎ केंद्राच्या मागे असलेल्या गल्लीत ही‎ घटना घडली.‎ वंदना सुभाष पवार (वय ५६, रा.‎ प्रोफेसर कॉलनी, जळगाव)‎ यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.‎ त्या मुलगा आर्यन (वय १७) याच्या‎ सोबत रात्री शतपावली करीत होत्या.‎ या वेळी दुचाकीने आलेल्या दोन‎ भामट्यांनी अंधाराचा गैरफायदा घेत‎ सुरुवातीला या दोन्ही मायलेकांच्या‎ मधून दुचाकी नेली. यामुळे दोघांना‎ घाम फुटला. तर काही सेकंदात रेकी‎ केल्यानंतर भामटे यू-टर्न घेऊन पुन्हा‎ आले.

यानंतर मागे बसलेल्या‎ भामट्याने वंदना यांच्या गळ्यातील‎ सोनसाखळी ओढली. आर्यनने‎ आरडाओरड करून चोरट्यांचा‎ पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एक अनोळखी तरुण देखील‎ आर्यनच्या मदतीला आला होता;‎ परंतु चोरटे भरधाव दुचाकीने‎ महामार्गाच्या दिशने निघून गेले. या‎ भागात काही ठिकाणी पथदिवे‎ नसल्याने रात्री अंधार असतो. पवार‎ मायलेकही काही मिनिटांसाठी‎ अंधार असलेल्या गल्लीतून जात‎ असतानाच रेकी केलेल्या‎ चोरट्यांनी हातसफाई केली. वंदना‎ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून‎ जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला. पाेलिस‎ उपनिरीक्षक गणेश देशमुख या‎ घटनेचा तपास करीत आहेत.‎

सीसीटीव्ही फुटेज घेतले‎
घटनेनंतर पवार यांनी जिल्हापेठ‎ पोलिस ठाण्यात माहिती दिली.‎ पोलिसांनी या परिसरातील एका‎ घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही‎ कॅमेऱ्यातून चाेरट्यांचे फुटेज‎ मिळवले आहे. त्यावरून तपास सुरू‎ केला आहे. दोन्ही चोरट्यांनी‎ तोंडाला काळे मास्क व डोक्यावर‎ टोपी घातल्या होत्या. त्यांचे वर्णन‎ पवार यांनी दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...