आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:जामनेरचे डाॅ. अशाेक काेळींच्या साहित्याची अमरावती विद्यापीठाने घेतली दखल

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी संस्कृतीचं वैभव, ग्रामीण जीवन, भवताल, गावगाडा साहित्यात अचूकपणे मांडणे यात जामनेरचे डाॅ. अशाेक काैतिक काेळी यांचा हातखंडा आहे. त्यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललित ग्रंथाची अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने वाङ‌्मय पारंगत एम.ए. मराठी अभ्यासक्रमासाठी निवड केली. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पुस्तक अभ्यासक्रमात असणार आहे.

डॉ. अशोक कोळी हे खान्देशातील प्रथितयश लेखक आहेत. आपल्या स्वतंत्र लेखनशैलीने त्यांनी वाङ‌्मय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे. जामनेर तालुक्यातील सुनसगाव सारख्या लहानशा खेड्यातून येऊनही, घरात कुठलीही लेखन, वाचनाची पार्श्वभूमी नसताना त्यांनी साहित्य प्रतिभा विकसित केली आहे. गावखेड्यातील कष्टकरी, शेतमजूर कुटुंबात जन्मलेले कोळी यांनी ‘अशानं आसं व्हतं’ या पुस्तकातून आपले बालपण व बालपणीचे कष्टमय जीवन शब्दबद्ध केलेले आहे. त्यातील प्रत्येक प्रसंग काळजाला भिडणारा आहे. पुणे येथील एक नामांकित साधना प्रकाशनाने हे अभ्यासपूर्ण असे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

चाैथीच्या बालभारतीमध्ये आहे ‘धूळ पेरणी’ कविता
व्यवसायाने जळगाव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक शिक्षक असलेले डाॅ. अशाेक कोळी हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. इयत्ता चाैथीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘धूळ पेरणी’ या कवितेचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कथेची निवड झालेली आहे. त्यानंतर आता अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने त्यांचे ललित साहित्य आता अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने त्यांचा सन्मान झाला