आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शेतीची नोंद नसतानाही जिल्ह्यातील 12 हजार लाभार्थ्यांचा अकरा हप्त्यानंतर लाभ बंद करण्यात आलेला आहे. तलाठी, कृषी सहाय्यकांनी शोध घेतल्यानंतरही त्या लाभार्थ्यांचा प्रशासनाला अद्यापही शोध लागलेला नाही. त्या लाभार्थ्यांच्या शेतीची नोंद पीएम किसानच्या पोर्टलवर झाल्याशिवाय त्यांना बारावा व तेरावा हप्ता देण्यात येणार नाही.
केंद्र सरकारकडे शेतीबाबत नोंद नसतानाही जिल्ह्यातील 12 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे अकरा हप्ते आतापर्यंत घेतलेले आहेत. या योजने अंतर्गत करण्यात आलेल्या लेखापरीक्षणामध्ये ही बाब उघडकीस आल्यानंतर या लाभार्थ्यांच्या बाराव्या हप्त्याचा लाभ सरकारने थांबविला होता. तेरावा हप्ताही देण्यात येणार नाही. शेती नसतानाही लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून आतापर्यंत घेतलेला लाभ वसूल करुन अपात्र करण्याची कारवाई होवू शकते.या लाभार्थ्यांचा तलाठी व कृषी सहायकांनी शोध घेतला. त्यानंतरही हे लाभार्थी आढळून आलेले नाहीत.
शेतीबाबत माहिती आढळून न आलेल्या 12 हजार लाभार्थ्यांना त्यांच्या शेतीबाबत पोर्टलवर नोंद करावी लागणार आहे. तलाठी व कृषी सहायकांनी शेतीची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेतला. त्यांना संबंधीत लाभार्थी आढळून आलेले नाहीत.
या योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेसाठी शासनाकडून दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली होती. अद्यापही 30 लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या लाभार्थ्यांनाही सरकारकडून शेवटची संधी देत त्यांच्या खात्यात योजनेचा 2 हजार रुपयांचा बारावा हप्ता जमा करण्यात आला. आताही त्यांनी ई-केवायसी न केल्यास तेरावा हप्ता न देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
योजने अंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांची स्थिती
पीएम किसान योजनेचे लाभार्थी 4 लाख 24 हजार
शेतीबाबत रेकॉर्ड न भरणारे लाभार्थी 12 हजार
ई-केवायसी न करणारे लाभार्थी 30 हजार
मृत लाभार्थी सुमारे 4 हजार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.