आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनातर्फे दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जामनेरात दिली. अ आणि ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीतर्फे काढण्यात आलेल्या पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या स्वागताप्रसंगी मंत्री महाजन बोलत होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या राज्यातील तीर्थक्षेत्र सर्व सोयींनी-युक्त करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही या वेळी मंत्री महाजन यांनी नमूद केले. पंढरपूर येथून शुक्रवारी मुक्ताईनगर जाण्यासाठी पांडुरंगराय पालखी निघाली. या पालखीचे शनिवारी जामनेरात आगमन झाले. संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या या पालखीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरात स्वागत केले. या वेळी पादुकांचे दर्शन घेऊन मनोगत व्यक्त करताना मंत्री महाजन यांनी राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी २ हजार कोटींचा निधी ठेवण्यात आला असल्याची माहिती दिली. पालखी सोहळा प्रमुख मेघराज वळखे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ देऊन मंत्री महाजन यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मंत्री महाजन यांनी भक्तांमध्ये बसून संत वचन श्रवण केले. या प्रसंगी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, अमोल महाराज पाटील, शरद पाटील, उल्हास पाटील, दीपक तायडे व मान्यवर उपस्थित होते.
संत मुक्ताबाई पालखी सोहळा ३४ दिवसांचा होता, तो आता २४ दिवसांचा केला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याप्रमाणे मुक्ताईच्या पालखी सोहळ्यालाही सर्व सुविधा व शासकीय मदत मिळावी, अशी मागणी रवींद्र हरणे महाराज यांनी केली. संत मुक्ताबाई तीर्थक्षेत्र हे सर्व सोयींयुक्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे सांगून पालखी सोहळ्याचे वैभव वाढवण्यासाठी ही मदत करण्याची ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.