आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा या उद्देशाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. शालेय शिक्षण विभागातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जानेवारीपासून शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. ३ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यात अनेक शाळांनी नोंदणी न केल्याने १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील २८० शाळांनी नोंदणी अद्यापपर्यंत केलेली आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात २८५ शाळांनी नोंदणी केली होती. राज्यातील अनेक शाळांनी नोंदणी न केल्याने नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, शाळांना मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशास उशीर होणार आहे. शाळांच्या प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. किचकट प्रक्रियेमुळे जिल्ह्यात गत पाच वर्षांत आरटीईच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत.
त्यामुळे यंदा उपलब्ध होणाऱ्या जास्तीत जास्त जागांवर प्रवेश करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे ठाकले आहे. एकीकडे शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तर दुसरीकडे आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष प्रवेशाकडे लागले आहे. सध्या नोंदणी झालेल्या २८० शाळांमध्ये ३१०० जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात येते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.