आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाते. गेल्या वर्षी ३१ जुलै २०२२ ला घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात जिल्ह्यातील पाचवीचा १२.६९% तर आठवीचा ७.४१% निकाल लागला. पाचवीचे ५६३ तर आठवीचे ३७५ अशा एकुण ९३८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
राज्यभरातून २९ हजार १७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. परीक्षा परिषदेतर्फे गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. या परीक्षेस पाचवीचे २३.९० टक्के तर आठवीचे १२.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणपडताळणीनंतर अंतरिम निकालच अंतिम ठरला. जळगाव जिल्ह्यात पाचवीसाठी ११ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या पैकी १० हजार ४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील १ हजार २७६ विद्यार्थी पात्र ठरले.
गुणवत्तेच्या आधरे त्यातील ५६३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तर आठवीसाठी ९ हजार २३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या पैकी ८ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ६३४ विद्यार्थी पात्र ठरले, गुणवत्तेच्या आधारे त्यातील ३७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
यंदा नोंदणी वाढली
कोविडच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. जळगाव जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या परीक्षेसाठी पाचवी व आठवीचे मिळुन ३१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा त्यात तब्बल नऊ हजार विद्यार्थ्यांची भर पडली असून पाचवीसाठी १९ हजार ७२९ तर आठवीसाठी ११ हजार ४५५ असे एकूण ३१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.
अशी मिळेल शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीसाठी इयत्ता पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरवर्षी १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता आठवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वार्षिक १५०० रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.