आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्रॅफिक विभागाचे काम काय आहे वाहतूक सुरळीत करणे की वसूली करणे? एका बाजूला वाहतूक कोंडी झालेली असताना वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाकडे कागदपत्रे तपासून वसूली करतात. त्यांना विचारले असता आम्हाला वरुन टार्गेट देण्यात आले असल्याचे सांगतात. त्यांना कोणी टार्गेट दिले आहे का? असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. नियोजन भवनात ही बैठक झाली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना देऊन विषयावर तात्पुरता पडदा टाकला. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक असताना ते कोंडी सोडवण्याऐवजी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून दंड वसुली करतात. त्यांना असे काही टार्गेट दिले आहे का? आणि ते कोणी दिले आहे? असा प्रश्न आमदार सावकारेंनी उपस्थित केला. महामार्गावर वेग मर्यादेचे फलक नसताना वाहतूक पोलिसांकडून वेग मर्यादा तोडल्याने दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. चिखली ते तरसोद दरम्यान महामार्ग चौपदरीकरण झालेले नसताना मक्तेदाराकडून टोलवसुली केली जात आहे. त्याबाबत फलक लावून महिन्याची पास काढण्याबाबत जाहिर सूचना लावण्यात आल्याचे सांगितले. ही वसूली ताबडतोब बंद करण्याची मागणी देखील त्यांनी केली. वाहतूक पोलिसांची वसूली व महामार्गावरील टोल आकारणी या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि न्हाईचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.