आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ अधिसभा निवडणूक:तीन पक्षांत समन्वय नसल्याने‎ ‘विकास मंच''ने रेकाॅर्ड मोडले‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट)‎ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत‎ १०पैकी तब्बल नऊ जागांवर विजय मिळवून‎ विद्यापीठ विकास मंचने मागच्या‎ निवडणुकीपेक्षाही एक जागा अधिक‎ मिळवण्यात यश मिळवले आहे. नेहमीप्रमाणे‎ विष्णू भंगाळे हे विरोधकांपैकी एकमेव‎ उमेदवार अधिसभेवर निवडले गेले आहेत.‎ गेले वर्षभर सुरू असलेली तयारी आणि‎ मतदार नोंदणीत घेतलेला पुढाकार यामुळेच‎ विद्यापीठ विकास मंचला हा विजय साध्य‎ झाला, असे दिसते.‎ महाविकास आघाडीतील शिवसेना,‎ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी‎ पहिल्यांदाच ही निवडणूक एकत्रितपणे‎ लढल्याने त्यांना अधिक जागा मिळतील,‎ असा दावा केला जात होता.

मात्र, तो पोकळ‎ होता हे गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू‎ असलेल्या मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे.‎ तीन पक्ष एकत्र असले तरी आपापसात‎ समन्वय नसणे, ऐनवेळी उमेदवार निश्चित‎ करून निवडणुकीला सामोरे जाणे, मतदार‎ नोंदणीत अपेक्षित पुढाकार न घेणे ही‎ महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे‎ आहेत. या तीन पक्षांपैकी कोणत्याच पक्षाचे‎ नेते निवडणुकीच्या प्रचारात आणि मतदारांना‎ मतदानासाठी बाहेर काढण्यात फारसे पुढे‎ आले नाही. या उलट विद्यापीठ विकास‎ मंचच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक‎ संघ व भारतीय जनता पक्षाचेही आमदार,‎ नगरसेवक कामाला लागले होते, असे चित्र‎ दिसत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेचे विष्णू‎ भंगाळे काठावरच्या मताधिक्याने निवडून‎ आले आहेत. त्यांनीही गेले वर्षभर संपर्क‎ वाढवला होता आणि मतदार नोंदणीसाठीही पुढाकार‎ घेतला होता. त्याचे फळ त्यांना‎ मिळाले आहे.‎ भंगाळेंच्या विजयावर चर्चा‎ १९९८ पासून विद्यापीठाच्या‎ अधिसभेचे सदस्य असलेल्या‎ विष्णू भंगाळे यांनी यंदाही विजय‎ मिळवला आहे. ते एकटेच कसे‎ निवडून येतात? असा प्रश्न‎ त्यांच्याच मविआतील काही‎ मंडळी निवडणुकीपूर्वीच विचारत‎ होती. विद्यापीठ विकास मंचशी‎ संधान साधून ते हा विजय‎ हस्तगत करतात, अशीही टीका‎ झाली. पण भंगाळे यांनी ती‎ फेटाळून लावली होती.‎

मतमोजणीच्या वेळी‎ सकाळपासून ते हरकती घेण्यात‎ व सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यात‎ आघाडीवर होते. मात्र, यंदाही ते‎ एकटेच निवडून आले. तेही कमी‎ मताधिक्याने. यात आपले‎ नियोजन, इतक्या वर्षांचा संघर्ष,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांसाठी सातत्याने घेत‎ असलेली भूमिका आणि मतदार‎ नोंदणीसाठी घेतलेली मेहनत‎ यांचा महत्वाचा वाटा आहे, असे‎ ते सांगतात. विद्यापीठ विकास‎ मंचच्या विजयासाठी गेल्या‎ वर्षभरापेक्षा अधिक काळापासून‎ काम करीत होते. मतदारांच्या‎ नोंदणीपासून त्यांच्या भेटी‎ घेण्यापर्यंत नियोजनबद्ध काम‎ सुरू होते. प्रत्यक्ष मतदानाच्या‎ दिवशी तीनही जिल्ह्यांचे एकूण‎ ६८ भाग तयार केले गेले. या सर्व‎ ठिकाणांवर सुमारे ७५० कार्यकर्ते‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धुरा सांभाळून होते. यामुळे‎ विजय मिळवणे शक्य झाल्याचे‎ विकास मंचचे प्रमुख सांगतात.‎

यंदा पहिल्यांदाच पदवीधर‎ गटाच्या निवडणुकीपूर्वीच‎ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन‎ परिषद सदस्य, अधिसभेवरील‎ आठ सदस्य जाहीर करण्यात‎ आले. अप्रत्यक्षपणे हा शैक्षणिक‎ संस्थाचालक आणि मतदारांवर‎ दबाव टाकण्याचा प्रकार होता.‎ त्यामुळे असे निकाल समोर आले‎ आहेत असा आरोप विष्णू भंगाळे‎ यांनी निकालानंतर केला.‎

बातम्या आणखी आहेत...