आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर तुमचे तुणतुणे बंद पाडायला वेळ लागणार नाही, असा सल्लासुद्धा शेट्टींनी सेलिब्रिटींना दिला. देशात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात चक्काजाम आंदोलन होत आहे. कोल्हापुरात सुद्धा विविध संघटनांच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. कोल्हापूर शहरातील मुख्य चौक असलेल्या दाभोळकर कॉर्नर येथे हे आंदोलन करण्यात आले.भविष्यात जीएसटी आणि आयकर भवनाला घेराव घालून सरकारची कोंडी करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी म्हणाले, गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, हे अन्यायकारी सरकार अद्याप आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. मात्र, आज चक्का जामच्या माध्यमातून आम्ही सरकारला केवळ इशारा देत आहोत. आम्हाला माहीत आहे, पोपटाचा जीव कशात आहे. सरकारचे महसुलाचे मुख्य माध्यम म्हणजे जीएसटी भवन आणि त्याच जीएसटी भवनाला बेमुदत घेराव घालून सरकारचे उत्पन्नाचे साधनसुद्धा बंद पडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
शेतकरी आता सरकारला आतंकवादी वाटू लागले...
केंद्र सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी थंडीची पर्वा न करता अजूनही त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. मात्र, केंद्र सरकारला अद्याप दया आलेली नाही. उलट शेतकऱ्यांनाच दहशतवादी आणि आतंकवादी म्हटले जात आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुले आता या सरकारला आतंकवादी वाटू लागली आहेत. आमची मुले तिकडे सिमेवर देशाचे रक्षण करत आहेत आणि तुम्ही आम्हालाच आतंकवादी म्हणता? असा सवाल करत आम्हाला देशप्रेम शिकवू नका, असेही शेट्टी म्हणाले.
पोलिस आणि आंदोलकात झटापट...
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने दाभोळकर कॉर्नरवरील शिग्नलजवळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करीत राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेत असताना जोरदार झटापट झाली. बंदोबस्तात आंदोलकांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तणाव निवळल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे नामदेव गावडे, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, प्रशांत आंबी यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.