आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हैदराबादच्या निजामाची महाबळेश्वरमधील मालमत्ता सील करण्यात आली आहे. भाडेतत्वावरील 15 एकर 15 गुंठ्याचा भूखंड आणि त्यावरील अलिशान वुडलाॅन बंगल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
महाबळेश्वर च्या तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या बंदोबस्तात मुख्य बंगल्यासह आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या. आजच्या बाजारभावाप्रमाणे या मिळकतीची किंमत 250 कोटी रुपयांच्या घरात आहे.
मुख्य बंगल्या शेजारच्या स्टाफ क्वार्टरमध्ये अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहत आहेत. शनिवारी सकाळी बंदोबस्तात वुडलॉन बंगल्यावर दाखल झालेल्या महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा चौधरींनी शासकीय कारवाईची माहिती देवून शिंदे दाम्पत्याला सर्व साहित्य बाहेर घेऊन बंगला सोडण्यास सांगितले.
आदेशाप्रमाणे त्यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत बंगला रिकामा केला. त्यानंतर तहसिलदारांच्या उपस्थितीत मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्या, निझामांच्या स्टाफ क्वार्टरसह दोन्ही गेट सील करण्यात आली.
मिळकत ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जमावामुळे या भागात दि. 1 डिसेंबर रोजी तणाव निर्माण झाला होता. याआधीही अनेक वेळा मिळकत ताब्यात घेण्यावरून दोन गटांमध्ये राडे झाले होते. ही बाब लक्षात घेऊन सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दि. 2 डिसेंबरला महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा चौधरी यांना वुडलाॅन मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, बंदोबस्ताची कुमक शनिवारी मिळाली. त्यानंतर मिळकत सील करण्याची कारवाई करण्यात आली.
ब्रिटीशांनी हा भुखंड भाडेपट्ट्याने पारशी वकीलांना दिला होता. स्वातंत्र्यानंतर 1952 साली हा भूखंड हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादुर नबाब ऑफ हैदराबाद यांच्या नावे करण्यात आला. नबाबांकडे आयकराची 59 लाख 47 हजार रूपयांची थकबाकी होती. या आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी ऑफिसर कोल्हापूर यांच्या पत्रानुसार थकबाकीची नोंद मिळकत कार्डावर करण्यात आली. जोपर्यंत ही वसुली होत नाही तो पर्यंत ही मिळकत विक्री करणे, गहाण ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली होती.
हैदराबाद येथील नबाबांचे वारस म्हणून नबाब मीर बरकत अल्लीखान बहादुर यांचे नाव लावण्यात आले. 2003 साली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व पट्टेदारांची नावे वगळून ही मिळकत शासनजमा करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेवून 2005 साली पुन्हा पूर्वीप्रमाणे परिस्थिती कायम करण्यात आली. 2016 साली मिळकतीचे हस्तांतरण झाले आणि मिळकतीवर डायरेक्टर हर्बल हाॅटेल प्रा. लि. तर्फे दिलीप ठक्कर यांचे नाव लागले. तेव्हापासून ही मिळकत ठक्कर आणि नबाब यांच्या वादात अडकली होती. तसेच मिळकत ताब्यात घेण्याचेही वारंवार प्रयत्नात झाले होते. अखेर शनिवारी हैदराबादच्या निजामाची ही मिळकत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सील करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.