आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगा नदी आज पात्राबाहेर पडली असून पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे. महापुराचा धोका दर्शवणाऱ्या इशारा पातळीकडे पुराच्या पाण्याची वाटचाल सुरू आहे. ९० बंधारे पाण्याखाली गेले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गतवर्षी याच दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते.
पंचगंगा नदी
पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३४ फूट ६ इंचावर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ९० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.पंचगंगेचे इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्हाप्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत शाहुपुरी कुंभार गल्लीत पुराचे पाणी शिरले आहे. कोल्हापूर गगनबावडा या राजमहामार्गावर मांडुकली आणि शेनवडे गावाजवळ पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने कोकणात जाणारा हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे : जिल्हाधिकारी दौलत देसाई
जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता आज रात्रीच राजाराम बंधारा येथील इशारा पातळी ओलांडली जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेषत: चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांनी त्वरित स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उप विभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदींसह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, दिवसाला सरासरी 150 मिमी पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज रात्रीच राजाराम बंधारा येथील इशारा पातळी ओलांडली जाईल. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतराला तात्काळ सुरूवात करावी. नागरिकांनीही विशेषत: नदीकाठच्या गावातील लोकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे. गावा-गावात दवंडी देवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देवून सतर्क करा. ग्रामस्थांचे स्थलांतर करताना त्यांची काळजी घ्या. ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे अशा ठिकाणी पर्यायी मार्गाचा सक्तीने वापर करायला लावा. ज्या रस्त्यांवर पाणी आले आहे तेथे बॅरिकेट्स लावून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करा. कोणताही धोका निर्माण होणार नाही
कोव्हिड रुग्णांची सुविधा आणि सोय करा
संपर्क तुटलेल्या गावांमध्ये कोव्हिडचे रूग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्या उपचारासाठी पर्यायी मार्गाने सुविधा करा. कोव्हिड केंद्रामध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध ठेवा. स्थलांतरीत करताना कोव्हिड रूग्णांसाठी योग्य अंतर राखले जाईल याची काळजी घ्या. ज्यांचे स्वॅब घेतले आहेत, जे संशयित आहेत अशांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवा. व्हेंटिलेटर्स उपलब्ध ठेवा. मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालयांचे वसतिगृह आदी ठिकाणी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या.
स्थानिक बोटींसाठी लाईफ जॅकेट सक्तीचे
ज्या गावांमध्ये स्थानिक बोटी आहेत विशेषत: शिरोळ तालुक्यात त्या बोटी चालवण्यासाठी लाईफ जॅकेट सक्तीने असले पाहिजे. त्यासाठी गावांमध्ये 10-10 लाईफ जॅकेट द्यावेत. प्रत्येक तालुक्याला रेस्क्यू फोर्सचे वाटप केले आहे. त्या पथकांना आजच बोलवून घेवून नियोजन करा. जनावरांना स्थलांतरासाठी प्राधान्य द्या. पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या गावातील कुटूंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करा, असेही ते म्हणाले.
पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करून बाधित होणाऱ्या गावांमधील नागरिकांना आजच स्थलांतरीत करा. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून ऑक्सिजन सिलींडर, औषधांचा साठा याबाबत नियोजन करा. गतवर्षीचा अनुभव पाहून नियोजन करावे असे सांगितले आहे.
अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये
प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवकासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. आपत्कालीन मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.