आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ajit Pawar Letter To Eknath Shinde Over Unseasonal Rains And Agricultural Losses Demand Financial Assistance |Abdul Sattar | Mumbai News

अवकाळीने शेतकरी खचला:गारपीटग्रस्त पिकांसाठी हेक्टरी 50 हजार, फळबागांसाठी 1 लाखांची मदत द्या - अजित पवारांचे CM शिंदेंना पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपीठीने पशुधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एनडीआरएफमधून ४ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी.

मागील खरीपात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करण्यात आली होती. २७ मार्च २०२३ च्या नवीन आदेशामुळे दुप्पट मदतीचा निर्णय बदलून एनडीआरएफच्या जुन्या निकषात मामुली वाढ केलेली आहे. या नवीन आदेशाचा फेरविचार करुन एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा.

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. तथापि यासाठी NDVI चा नवीन निकष निश्चित करण्यात आला आहे. या निकषामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे या निकषाचा फेरविचार करावा अशी मागणीही अजित पवार यांनी पत्रात केली आहे.

याशिवाय पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याबाबत केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारतर्फे रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावे. पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेती वाचवण्यासाठी वन अधिकारी व टसर शेती उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधून सुरक्षितपणे हा व्यवसाय पुढे कसा सुरू राहिल याबाबतीत सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न करावेत अशा प्रमुख आठ मागण्या अजित पवार यांनी पत्रात केल्या आहेत. दरम्यान हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे. शेतीसाठी केलेला खर्चदेखील निघेल की नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.