आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर आता गृहमंत्री सुद्धा बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच चर्चेदरम्यान शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या बैठकीत आपण अँटिलिया प्रकरणात पवारांना सद्यस्थितीची माहिती दिली असे अनिल देशमुख म्हणाले. तर अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रामुख्याने नागपूरच्या मिहान प्रकल्पासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली असा दावा अनिल देशमुख यांनी केला. यासंदर्भात संपूर्ण माहिती मी पवारांना दिली. त्यांच्या विभागातून सहकार्य मिळेल अशी मागणी केली. सोबतच, अँटिलिया प्रकरणात सध्या राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास केला जात आहे. हा तपास सध्या योग्य दिशेने सुरू आहे. एवढेच नव्हे, तर या तपासामध्ये राज्य सरकारकडून तपास संस्थांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत. अधिकाऱ्यांच्या बदलीवर बोलताना, त्यांच्याकडून गंभीर चुका झाल्याने त्यांची बदली झाली असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अँटिल्या प्रकरणात मुंबईच्या क्राइम इनव्हेस्टिगेशन युनिटचे माजी प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था NIA ने त्यांची वाहने सुद्धा जप्त केली. गृहमंत्र्यांनी विरोधकांच्या दबावानंतर त्यांची बदली आणि नंतर निलंबनाची कारवाई केली. यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची देखील बदली करून त्यांना होम गार्ड दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव सुरू असतानाच गृहमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पवारांची भेट घेणे यातून चर्चांना उधाण आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.