आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने राज्यांना जीएसटी परताव्याची रक्कम दिली आहे. महाराष्ट्रालादेखील जीएसटी परतावा मिळाला असून त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण झाला आहे. जीएसटी परताव्याची संपूर्ण रक्कम महाराष्ट्राला मिळाली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीत नेत्यांनी केला आहे. तर केंद्र सरकारने आम्ही जीएसटी परताव्याचे पूर्ण रक्कम महाराष्ट्राला दिली, असे म्हटले आहे. दरम्यान केंद्र आणि राज्याच्या या वादात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी अर्थमंत्री अजित पवार व महाविकास आघाडी सरकरावर जोरदार टीका केली आहे. अर्थमंत्री हे पद बुद्धिमान माणसाकडे असावे, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला आहे.
"अजित पवार म्हणतात GSTचे 50% पैसे मिळाले अजून 15 हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांचे नवल वाटते, महाराष्ट्र 5 लाख कोटींचे मोठे व प्रगत राज्य पण GSTच्या 30/40 हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खाते असावे", अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.
पुढे नितेश राणे म्हणाले की, "सगळी चर्चा जीएसटीवर पण ठाकरे सरकारने 2 वर्षात 2 लाख कोटीचे कर्ज महाराष्ट्रावर लादले आहे या विषयावर कोण बोलत नाही. 2 वर्षात महाराष्ट्राला 2 लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज 50 हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसे हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाहीत", अशी टीका नितेश राणेंनी अर्थमंत्री अजित पवारांवर केली आहे.
महाराष्ट्राला 14 हजार कोटींचा परतावा
केंद्र सरकारने 21 राज्यांना जीएसटी परतावा म्हणून 86 हजार 912 कोटी रुपये दिले आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांभाळताना हातभार लागावा यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे या कालावधीसाठी या एकूण भरपाईपैकी महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.