आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलावरून राज्यात ठाकरे सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. राज्यभरात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते हे आंदोलन करत असल्याचे दिसतेय. वाढीव वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यातील वीज केंद्राबाहेर कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा करत आघाडी सरकार विरोधात नारेबाजी केली जात आहे.
कोरोनाच्या कठीण काळातसुद्धा आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दुप्पट तिप्पट वीज बिल पाठवून आता वीज बिल कनेक्शन तोडण्याची धमकी देणाऱ्या ठाकरे सरकारला आपण सारे मिळून धडकी भरवल्याशिवाय शांत बसायचे नाही. असे म्हणत भाजपने टाळाठोको हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे.
कांदिवली (प) येथील अदानी कार्यालयाजवळ आंदोलन
भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि योगेश क्षिरसागर यांनी कांदिवली (प) येथील अदानी कार्यालयाजवळ वीज ग्राहकांना फसवणाऱ्या आणि थकीत वीजबिल न भरल्यास कारवाईचे आदेश देणाऱ्या मुजोर ठाकरे सरकारच्या निषेधार्थ टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले.
पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये आंदोलन
तर महावितरणाच्या निषेधार्थ आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली बीड मध्ये वीज वितरण कंपनी व राज्य सरकारच्या विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले.
वसई विरार येथेही भाजप आक्रमक
वसई विरार जिल्हयात वीज वितराण कार्यालयासमोर टाळा ठोक व हल्लाबोल आंदोलन जिल्हाध्यक्ष राजन नाईक याच्या नैतृत्वात संपूर्ण वसई विरार जिल्हयात करण्यात आले. या आंदोलनात वीज ग्राहक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.#टाळा_ठोको_हल्लाबोल pic.twitter.com/ClJuT5XP2r
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 5, 2021
वडाळाच्या बेस्ट कार्यालयासमोर आंदोलन
आमदार कोळंबकर आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकारला धडा शिकवण्यासाठी आणि महावितरणचा निषेध करण्यासाठी वडाळाच्या बेस्ट कार्यालयासमोर वीज बिलाविरोधात टाळा ठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे.
दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारने का घेतली?
सर्वसामान्य जनतेला लुबाडणाऱ्या आणि आपला मनमानी कारभार चालवणाऱ्या महाभकास आघाडी सरकारला दणका देण्यासाठी भाजपतर्फे वीज बिल विरोधात राज्यभरात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहनही भाजपने केले आहे. तसेच आपल्या प्रियजनांना सर्वच गोष्टींमध्ये सूट दिली मात्र गोर गरीब जनतेला भरमसाट वीज बिल पाठवून सवलत देण्याचे आश्वासन देऊन आता दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारने का घेतली? असा सवालही भाजपने विचारला आहे.
सरकारला आता विजेचे जोरदार झटके दिल्याशिवाय मागे हटायचं नाही !
राज्यातील ७५ लाख वीज बिल ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याचे नोटीस राज्य सरकारकडून पाठवण्यात आली. तब्बल ४ कोटी जनतेला अंधारात ढकलणाऱ्या ठाकरे सरकारला आता विजेचे जोरदार झटके दिल्याशिवाय मागे हटायचं नाही ! भरमसाट वीज बिल आल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या. आपल्या मनमानी कारभारामुळे जनतेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करून त्यांची गळचेपी करणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध! असे म्हणत भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येत आहे.
सरकारच्या मनमानी कारभाराला आळा घालणारच !
'शेतकऱ्यांनो, वीज बिल भरायला शिका' अशी शिकवण थेट बळीराजाला देणाऱ्या अजित पवारांचं महाभकास आघाडी सरकारच शेतकऱ्यांचे वीज बिल कनेक्शन कापत सुटले आहे. बळीराजाबद्दल कसलाही आदर नसणाऱ्या ठाकरे सरकारच्या मनमानी कारभाराला आळा घालणारच ! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता आपल्याच आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. याचीच आठवण करून देण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन भाजपने केलेय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.