आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना केली असून 'अमंगल ते सर्व नष्ट होवो' असे साकडे गणरायाला घातले आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे
मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून, जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं.
मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे. गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री असल्याचे ते यावेळी म्हणाले.
जनतेला जागरुक करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा
ते पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूयात ही शपथ आजच्या या मंगल दिनी घेऊयात असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.