आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये कुणी मोठा, कुणी छोटा नाही. तिन्ही पक्षांत योग्य समन्वय असल्याचे स्पष्ट करत काँग्रेसच्या भूमिकेचा सरकारमध्ये योग्य तो सन्मान राखला जाईल, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे समजते.
मंगळवारी रात्री उशिरा राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी फोन केला. दोघांत महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची स्थिती, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यासंदर्भात चर्चा झाली. सरकारच्या पाठीशी काँग्रेस भक्कमपणे उभी आहे, अशी ग्वाही राहुल यांनी या वेळी दिल्याचे समजते. राहुल यांनी उद्धव यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. राहुल आणि उद्धव यांच्यात फोनवर चर्चा झाल्याच्या वृत्तास काँग्रेसचे नेते व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दुजोरा दिला आहे. पटोले सध्या दिल्लीत आहेत.
दोन्ही पक्षांना लागल्या माेठ्या आशा : उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत जाऊन सोनिया गांधी व राहुल यांची भेट घेतली होती. राहुल आणि उद्धव यांच्यात पुन्हा संवाद झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसच्या योजना गांभीर्याने घेतल्या जातील, अशी आशा काँग्रेसच्या मंत्र्यांना वाटते आहे. दुसरीकडे, आघाडी सरकार अधिक भक्कम झाल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याने झाला होता संभ्रम
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी एकीकडे विरोधकांवर टीका करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असेही वक्तव्य एका प्रश्नाच्या उत्तरात केले होते. त्यामुळे गोंधळ उडाला. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.