आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजकीयदृष्ट्या पवारांवर विश्वास ठेवून पुढे जाणे योग्य नाही, हे फडणवीसांनी कायम लक्षात ठेवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके काय झाले हे फडणवीस यांनाच माहीत असेल. पण पवार हे जेव्हा एखाद्या पक्षाला प्रस्ताव देतात, तेव्हा तोच प्रस्ताव दुसऱ्या पक्षालाही दिला नसेल याची शाश्वती नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातील कोरोना आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडींबद्दल राणे यांनी एका मराठी पोर्टलशी संवाद साधला. २०१९ च्या निवडणुकीनंतर थेट शरद पवार यांच्याकडून भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव आला होता. पण ऐनवेळी पवारांनी वेगळी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी अलीकडेच केला होता. त्याबद्दल बोलताना राणे म्हणाले की, ‘राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे. शरद पवार हे काहीही घडवू शकतात. भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे काँग्रेसला एकाकी पाडण्यासाठी केले होते, असे मी मानत नाही. पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय भावनेतून ते बोलले असावेत.
हे सरकार गेल्याशिवाय कोरोना जाणार नाही
राज्यातील कोरोनाच्या स्थितीवरून राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. ‘कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. लोकांचे मृतदेह ठेवायला जागा नाही. रुग्ण वाढत आहेत. जनतेची सुरक्षा करण्यास हे सरकार असमर्थ आहे. लॉकडाऊन घोषित केले जाते पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. देशातील करोना रुग्णांचे आकडे महाराष्ट्रामुळे वाढलेले आहेत. जनता बेजार झाली आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार बदलल्याशिवाय आपल्या राज्यातून कोरोना काही केल्या जाणार नाही,’ अशी टीकाही राणे यांनी या वेळी बोलताना केली.
घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री
‘राज्य चालवण्याचा कुठलाही अनुभव मुख्यमंत्र्यांना नाही. सरकारमध्ये आपसात मतभेद आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणांवर अंकुश नाही. घरात बसून आदेश काढले जातात. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी आजवर पाहिला नाही,’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. महाराष्ट्र भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असेही ते म्हणाले.
पवार, फडणवीसांच्या उत्तराकडे आता लक्ष
राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच पवार राणे यांच्या वक्तव्यावर काय उत्तर देतात याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.