आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे कान टोचले.
राजकारणात आचारसंहिता हवी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. सत्तारांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. आम्ही या वक्तव्याचा विरोधच करु. राजकारणात आचारसंहिता पाळायलाच हवी. ही आचारसंहिता ज्याप्रमाणे आम्हाला लागू आहे, त्याप्रमामे ही आचारसंहिता विरोधकांनाही लागू आहे.
मोठ्या नेत्यांनी आवर घालावा
फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, विरोधकही ज्याप्रमाणे खोके-बोके अशी टीका करतात, तीदेखील चुकीची आहे. दोन्ही बाजुंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी येवढ्या खाली जाऊ नये, असे मला वाटते. तसेच, त्या-त्या पक्षातील मोठे नेते आपल्या नेत्यांना याबद्दल काही सांगत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन करत अब्दुल सत्तार यांना सुनावले. त्यानंतर जाहीर सभेत सत्तारांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
माफीने समाधान नाही
मात्र, अब्दुल सत्तार यांच्या केवळ माफीने काही होणार नाही. तर, त्यांची मंत्रिमंडळातूनच हाकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
राजीनाम्यावर फडणवीसांचे मौन
राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नाही, याचा विचार राज्यपालांनी करावा. फडणवीसांनीदेखील त्यांना हे वक्तव्य मान्य आहे की नाही? हे स्पष्ट करावे. अखेर यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्तारांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
मात्र, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार की नाही, यावर बोलणे फडणवीसांनी टाळले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.