आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रामध्ये येत्या 3 दिवसांसाठी पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज दिली. यावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे. विरोधकांना म्हणायचे राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचे हे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.
हात झटकायचे बंद व्हायला हवे
पत्रकारांशी संवाध साधताना फडणवीसांना लसीकरणाच्या तुटवड्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, 'राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेले आरोप चुकीचे आहेत. दरम्यान या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्रासोबत चर्चा करणे आवश्यक आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचे आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवे. विरोधकांना म्हणायचे राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करणे बंद करावे.' असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
रोज साठा येत असतो
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा केंद्राकडून आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा केला जात आहे. सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला दिल्या जात आहेत. तसेच तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाही.'
काय म्हणाले होते राजेश टोपे?
राजेश टोपे म्हणाले होते की, 'सध्या महाराष्ट्रात 14 लाख कोरोनावरील लसीचा पुरवठा आहे. हा पुरवठा 3 दिवसांपर्यंतच पुरेल. यामुळे आम्ही केंद्राकडे प्रत्येक आठवड्याला 40 लाख करोना लसीचे डोस पुरवण्याची मागणी केली आहे' तसेच, 'लसीकरण केंद्रावर पुरेसे लसीचे डोस उपलब्ध नाहीत. यामुळे अनेकांना पुन्हा परत पाठवले जात आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असे मी म्हणणार नाही. मात्र लस पाठवण्याचा वेग हा कमी आहे. हा वेग आणखी वाढवता येईल. यासोबतच, 20 ते 40 वयोगटातील जनतेला प्रधान्याने लसीकरणाची परवानगी द्यावी' अशी मागणीही आरोग्य मंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.