आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगल्याचा अवैध भाग पाडण्याच्या मुंबई महापालिकेच्या कारवाई विरोधात कंगना रनौतच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस. जे. कत्थावाला व आर. आय. छागला यांच्या पीठाने कंगना विरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यास आक्षेप घेतला. पीठाने म्हटले, आम्ही तिच्या वक्तव्याशी सहमत नाही. म्हणून काय तिचे घर पाडणार का? एका खासदाराला हे शोभून दिसते का? आम्हीसुद्धा महाराष्ट्रीयन आहोत. आम्हालाही महाराष्ट्रीयन असण्याचा अभिमान आहे. परंतु कोणाचे घर पाडणार नाही. तुमच्या बोलण्याची ही पद्धत योग्य आहे का? तुम्हाला असे बोलणे शोभत नाही, असेही न्यायमूर्ती म्हणाले.
तत्पूर्वी संजय राऊत यांच्या वकिलांनी शपथपत्र दाखल करून म्हटले, राऊत यांनी कोणाचे नाव घेतलेले नाही. तसेच धमकीही दिली नाही. यावर पीठाने संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला. या मुलाखतीत राऊत यांनी उखडून टाकू, असा दम दिला होता. पीठाने याचा अर्थ विचारला.
मुंबई महापालिकेने ९ सप्टेंबर रोजी कंगनाने बंगल्याचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत तेथील काही भाग पाडला होता. यावरून कंगनाने याचिका दाखल करत २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.
बीएमसीची माझ्या शेजाऱ्यांचेही घर पाडण्याची धमकी : कंगना
मुंबई महापालिकेने माझ्या शेजाऱ्यांची घरे पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप मंगळवारी कंगनाने केला. माझ्या शेजाऱ्यांना माझ्यापासून एकटे पाडण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. तिने समाज माध्यमावर म्हटले, मुंबई महापालिकेने माझ्या सर्व शेजाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. मुंबई महापालिकेने मला सामाजिकदृष्ट्या एकाकी पाडण्याची धमकी दिली आहे. जर शेजाऱ्यांनी मला पाठिंबा दिला तर त्यांचीही घरे पाडण्यात येतील, अशी धमकी दिल्याचे कंगनाने सांगितले. माझ्या शेजाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात काही वक्तव्ये केलेली नाहीत. कृपया, त्यांना तरी सोडा, असेेही कंगना म्हणाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.