आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वर्षभराचा काळ हा काही एखाद्या सरकारच्या मूल्यमापनासाठी पुरेसा काळ नाही. त्यातही आताच्या महाविकास आघाडी सरकारप्रमाणे तीन प्रमुख पक्ष थेट सत्तेचे वाटेकरी आणि इतरांचा पाठिंबा असेल तर एकमेकांशी ‘ट्यून’ होण्यातच वेळ जातो. त्यातही कोरोनासारख्या महामारीशी लढाई आणि त्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातील निधी यामुळे बहुतांश खात्यांची निधी कपातच झाली. मंत्र्यांच्या कामावर मर्यादा आल्या. तरीही प्रमुख खात्यांनी जे काम केले त्यामुळे सरकार वर्षभराच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले, असेच म्हणायला हवे.
आरोग्य मंत्र्यांची कामगिरी उत्तम
कोरोनाकाळात सर्वाधिक जबाबदारी होती ती सार्वजनिक आरोग्य खात्यावर. त्या खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी या काळात प्रचंड मेहनत घेतली आणि तितकाच संयमही पाळला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांचे संपूर्ण खाते झटून काम करीत होते. वाढते रुग्ण आणि मृत्युदर यावरही नियंत्रण आणण्यात खात्याला यश मिळाले आहे.
गृह मंत्रालयाचा गाजावाजाच खूप
गृह मंत्रालयाकडून अधिकृत आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. पण हे खाते या वर्षभरात या ना त्या कारणाने गाजले मात्र भरपूर. विशेषत: सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौतवरील दाखल गुन्हा, अधिकाऱ्यांच्या बदल्या हे चर्चेचे विषय राहिले. मंत्री अनिल देशमुख यांनी परिस्थिती मात्र खुबीने हाताळली.
शिक्षण खात्यावर प्रश्नांचाच भार
कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा मुद्दा ऐरणीवर होता. परीक्षांचा मुद्दाही गाजला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय घ्यायला वेळ लावला असला तरी परिस्थितीही तशी होती. महाविद्यालयीन परीक्षांचा मुद्दा सावंतांनी उगाचच प्रतिष्ठेचा केला. आजही त्याबाबतीत अडचणी आहेतच.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.