आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:शेजारी बसणाऱ्या ठाण्यातील नेत्याची चौकशी बंद : पवार

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचे प्रकरण नंतर थंड बस्त्यात गेले, असा आरोप देशातील प्रमुख ९ पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.

‘भाजपमध्ये आल्यानंतर कुणाची चौकशी बंद झाली, याचे एक तरी उदाहरण दाखवून द्यावे, असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.‘ ‘त्यावर तुमच्या शेजारीच ठाण्यातील एक नेता बसताे. त्यांचेच प्रकरण पाहा. या नेत्याचे नाव घेऊन मी त्याला अवास्तव महत्त्व देऊ इच्छित नाही. मात्र, आणखीही एक-दोन उदाहरणे सांगता येतील, असे म्हणत खा. शरद पवार यांनी फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर दिले. दरम्यान, शरद पवार यांचा रोख आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त करत त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र, नंतर शिंदे गटासह प्रताप सरनाईक भाजपसोबत गेल्यानंतर त्यांचे प्रकरण पुढे सरकलेले नाही.

पत्र लिहून कारवाई थांबणार नाही दुसरीकडे, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे पत्र लिहून कोणाचीही सुटका होणार नाही. भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे मिळवणे बंद केल्यानंतरच कारवाई थांबेल. तसेच, भाजपमध्ये आल्यावर कुणाची चौकशी बंद झाली, याचे एक तरी उदाहरण दाखवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिले. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या बाजूलाच बसणारे एक ठाण्यातील नेते आहेत. त्यांची फाइल एकदा ओपन करून पाहा. केवळ हे एकच नव्हे तर आणखीही अशी उदाहरणे देता येतील. भाजपला आता अडचणीत आणण्यासाठी खेळी खेळली जात आहे.

फडणवीसांच्या आव्हानाला पवारांचे प्रत्युत्तर सिसोदियांची अटक चुकीची पवार म्हणाले, अलीकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी विरोधी पक्षातील अनेकांवर कारवाई केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही ईडीने अटक केली. याच सिसोदियांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम काम केले. देशात आणि देशाच्या बाहेरच्या लोकांनी सिसोदिया यांच्या कामाला मान्यता दिली. मात्र, सिसोदियांवर अबकारी धोरणात गैरव्यवहाराचा आरोप करून गुन्हा दाखल केला. दिल्लीत दारूवर कर अधिक होता. त्यामुळे लोक चोरून दारू आणायचे. त्यामुळे सिसोदिया यांनी कर कमी केला. त्यामुळे चोरीची आयात थांबली. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पंतप्रधानांनी याेग्य विचार करावा देशातील भाजपविरोधी पक्ष सत्तेत असलेली ८ राज्ये आहेत. या ८ राज्यांत वारंवार ईडी, सीबीआयच्या धाडी पडत आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले, ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना केली असल्याचे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...