आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे आज मुंबईत माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे दोन परस्परविरोधी मोर्चांमुळे मुंबईत आज वातावरण ढवळून निघाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेते मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करत आहेत.
पुण्यात पाकिस्तानचा झेंडा जाळला:बिलावल भुट्टोंविरोधात भाजप आक्रमक, राज्यात 1200 ठिकाणी आंदोलन करणार
उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे
कांदिवलीत भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अतुल भातखळकर म्हणाले, सुषमा अंधारे व संजय राऊत यांना माफी मागावीच लागेल. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी संजय राऊत व सुषमा अंधारे यांना अजूनही पक्षात कसे ठेवले, याचे उत्तर द्यावे.
अधिवेशनात ठराव करणार
अतुल भातखळकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाचे खरे स्वरुप जनतेसमोर आणण्याकरीता आम्ही हे माफी मांगो आंदोलन करत आहोत. येत्या हिवाळी अधिवेशनात खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनात ठराव करणार आहोत.
सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ठाणे बंद पुकारण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. सकाळपासून हा बंद सुरू झाला असून या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, रिक्षा सुरू असून काही प्रमाणात खासगी वाहतूकही सुरू आहे. विशेष म्हणजे भाजप व शिंदे गटाने या बंदला पाठिंबा दिला असूनही अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत.
हसावे की रडावे कळत नाही
ठाणे बंदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, हसावे की रडावे कळत नाही. ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो. बळाचा वापर करुन दुकान, रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हातावर हात ठेऊन बसले आहेत.
माफी मांगो आंदोलन कशासाठी?
आघाडीला श्रेय नको म्हणून भाजपचा प्रतिडाव
महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींविरोधात वातावरण तापत आहे. पुणे, सोलापूर बंदला प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यातच चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राम कदम यांनीही यांनीही बेताल वक्तव्ये करून भाजपच्या अडचणींत वाढ केली. महाविकास आघाडीने या अस्मितेच्या मुद्द्याचे राजकारण करत सरकारची कोंडी केली आहे. आता राज्यपाल बदलणे हाच पर्याय सत्ताधाऱ्यांकडे आहे. पण त्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये याची खबरदारी घेतली जात आहे. म्हणूनच मविआच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने प्रतिआंदोलनाचा डाव टाकला.
शिंदे गटाची रणनीती
शिंदेसेनेने ठाण्यात बंद पुकारून परजिल्ह्यातून येणाऱ्या मविआच्या आंदोलकांची कोंडी करण्याची रणनीती आखली. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार यात शंकाच नाही. त्यात विरोधकांच्या हल्ल्यापासून बचावासाठी भाजपने मविआविरोधी आंदोलनाची ढाल आतापासूनच पुढे केलेली दिसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.