आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादात सापडलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. विधिमंडळातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना क्राइम ब्रांचमधून काढत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यासंदर्भात गुरुवारी रात्रीच पत्रक निघाले आहे.
विरोधी पक्षाच्या दबावानंतर बदली
सचिन वाझे मुंबई पोलिसात गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. पण, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्यांचे नाव लावून धरले होते. मनसुख हिरेन हे अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक होते. त्यांचा मृतदेह 5 मार्च रोजी समुद्रकिनारी सापडला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचून दाखवला, त्यामध्ये मनसुख यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीने थेट सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर सभागृहातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना क्राइम ब्रांचमधून काढत असल्याची घोषणा केली होती.
एटीएसकडून 10 तास चौकशी
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सध्या महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसने वाझे यांचीही तब्बल 10 तास चौकशी केली. यामध्ये आपण मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ वापरली नाही. तसेच या प्रकरणात नाव आलेल्या धनंजय गावडेंना सुद्धा ओळखत नाही असे वाझेंनी एटीएसला सांगितले. वाझे स्वतःच आपल्या नावाची चर्चा होत असल्याने एटीएससमोर चौकशीसाठी हजर झाले होते असेही सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.