आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हाडातर्फे विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा आज अचानक रद्द करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, उमेदवारांची क्षमा मागून तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा रद्द करत असल्याची माहिती दिली. त्यावरून आता राज्यातील विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडी सररकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
विधानपरिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, ठाकरे सरकारला फक्त टक्केवारीतच रस असल्याचे म्हटले आहे. "प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्याला बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परीक्षा रद्द का करावी लागली. यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. एक-एक पै गोळा करून परीक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणेघेणे नाही", असा आरोप गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला आहे.
मध्यरात्री ट्विट करत परिक्षा रद्द
जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री अचानक ट्विट करत परीक्षा रद्द झाल्याचे सांगितल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम वाढला. राज्यभरातून आज अनेक विद्यार्थी परिक्षेसाठी राज्यातील अनेक भागात गेले होते. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना कळले की, परीक्षा रद्द करण्यात आली. एसटी बससेवा बंद असल्याने आज अनेक उमेदवार खाजगी वाहनांने परिक्षा केंद्रावर पोहोचले आहेत, त्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे देखील खर्च करावे लागले. याची भरपाई कोण देणार असा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.