आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. रुग्णालय, महाविद्यालय, कॉलेज, शाळा, रेल्वे, बस, सिनेमागृह आणि सभागृहात मास्क वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे गरजेचे आहे, असेआवाहन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाअधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.
पत्रात काय म्हटले?
राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचे प्रमाण तत्काळ वाढवावे, असे पत्रात म्हटले आहे.
या राज्यात रुग्णवाढ
महाराष्ट्रासह तेलंगाणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोना रुग्ण वाढत आहे. या राज्यात एका हजारांहून अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याची समोर येत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.
6 जिल्ह्यांत पंचसूत्री कार्यक्रम
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला शुक्रवारी पत्र लिहून उपाययोजना राबवण्याची सूचना केली. तर महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे. त्यामुळे राज्यात विशेषत: या सहा जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याची सूचना केंद्राने केली आहे. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र लिहिले आहे.
आठवड्यापासून झाली वाढ
राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना हे पत्र लिहिले आहे. देशात गेल्या तीन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या खालावली असताना आठवड्यापासून वाढत असल्याचे दिसून आल्याकडे लक्ष वेधले. देशभरात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना रुग्णसंख्या 15 हजारांच्या घरात पोहोचली आहे, तर पॉझिटिव्हिटी रेट 0.73 टक्क्यावर पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वी पॉझिटिव्हिटी रेट 0.52 % इतका होता. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 2 हजार 471 नवीन रुग्ण आढळून आले.
मास्क कुठे गरजेचा?
- रेल्वे
- बस
- सिनेमागृह
- सभागृह
- रुग्णालय
- कॉलेज
- शाळा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.