आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. महिला दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहे. तसेच महिलांविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान राजकीय नेत्यांकडूनही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच 'कोणाचही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा' असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर महिलांसाठी विशेष पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, '8 मार्च, आज जागतिक महिला दिन. मूळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील.’ त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही. राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही. तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा' असे पत्र राज ठाकरेंनी लिहिले आहे.
#महिलादिन#जागतिक_महिला_दिन#WomensDay#womenempowerment pic.twitter.com/vB5pyghObz
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2021
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.