आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू देवदेवतांवर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. प्रभूरामाच्या नावावर ज्यांनी करोडो जनतेकडून पैसे घेऊन स्वतःचे खिशे भरले, अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कार्यात जमीन घोटाळे करून पैसे खाल्ले, त्यांना देवदेवतांवर बोलण्याचा काय अधिकार? राज्यात शिंदे - भाजपची सत्ता आल्यानंतर सत्ताधाऱ्यांची दादागिरी वाढली असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
भाजपची झोप उडाली
नाना पटोले म्हणाले, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या 17 तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भाजपची झोप उडाली. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन करण्याची नौटंकी भाजप करत आहे.
वाचाळवीरांवर कारवाई नाही
नाना पटोले म्हणाले, राजरोसपणे धमक्या देऊन राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजपच्या लोकांनी महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार हे महापुरुषांचा आणि त्यांच्या कार्याचा अपमान करणारे आहे. भाजपच्या एकाही नेत्यांने वाचाळवीरांवर कारवाई केली नाही. उलट या वाचाळवीरांचा बचाव केला.
चोरांच्या उलट्या बोंबा
नाना पटोले म्हणाले, हिंदू भावनांचा केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या भाजपाने देवदेंवतांवर बोलू नये. हिंदू देवदेवता व महापुरुषांवरचे भाजपाचे प्रेम बेगडी आहे. महापुरुष व हिंदू देवतांच्या नावाखाली भाजप आंदोलन करत आहेत. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असे म्हणतात.
तेव्हा शेलार कुठे होते?
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानातून महापुरुषांचा अपमान झाला. त्यावेळी भाजप व आमदार आशिष शेलार कुठे होते? हा या महापुरुषांचा अपमान नाही का ? यावर भाजपाने माफी मागितली का?
भाजपची बोलती बंद होईल
नाना पटोले म्हणाले, मुंबईत मविआचा उद्या होणारा हल्लाबोल मोर्चा हा अतिप्रचंड व भाजपच्या बोलघेवड्यांची बोलती बंद करणारा असेल. जनतेत भाजपची पत राहिली नाही. जनतेत प्रचंड असंतोष आहे, म्हणून उरलेली पत राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.