आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर चिनी माकडांची घुसखोरी कधी थांबणार?:भारतीय जवान जखमी होत असताना मोदी सरकार शांत का?, नाना पटोलेंचा सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गलवान खोऱ्यानंतर आता अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाल्याची माहिती आहे. यावेळी उडालेल्या चकमकीत 10 ते 15 भारतीय जवानांना किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

डोळे मिटून का घेत आहात?

नाना पटोलेंनी म्हटले आहे की, चीनला डोळे दाखवण्याची वार्ता करणारे आज डोळे मिटून का घेत आहेत? भारतीय सीमेवर चालू असलेली चिनी माकडांची घुसखोरी कधी थांबणार? यात भारतीय जवान जखमी होत असताना मोदी सरकार शांत का?

चीनचे 50 सैनिक जखमी

नाना पटोले यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. माहितीनुसार 9 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. चीन सैनिक या ठिकाणी तारांचे कुंपण बांधण्याच्या हेतून आले होते. भारतीय जवानांनी त्याला विरोध करताच चीनी सैनिकांनी वायरचे कटर आणि लोखंडांच्या इतर अवजारांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. मा,त्र चीनचे 50 सैनिक प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेतच माघारी फिरले. तर, 10 ते 15 भारतीय जवान जखमी झाले.

फडणवीसच ओबीसींच्या हक्काचे मारेकरी

राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी विभागाने पुण्यातील 'ज्ञानदीप' संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे प्रस्तावित करून कोणाचा फायदा करून दिला जाणार आहे. वर्षाला ६ टक्के दरवाढ मंजूर असताना २०० टक्के शुल्कवाढ कोणाच्या सांगण्यावरून केली तसेच महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना 'ज्ञानदीप' वरच विशेष मेहेरबानी का? 'महाज्योती'ला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून शिंदे-फडणवीस सरकारने ओबीसी-व्हिजेएनटी मुलांचे हक्क हिरावून घेऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'महाज्योती'कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट या परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. 'महाज्योती'ने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर 'ज्ञानदीप' या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला आहे. आता शुल्क वाढीतील गौडबंगाल पुढे आले असून त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये. भारतीय जनता पक्ष (ओबीसी) इतर मागास समाजाच्या कल्याणकारी योजनांमध्ये अडथळा आणत असते. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलतीही मिळू दिल्या जात नाहीत. महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजातील मुलांना चांगल्या संधी मिळायला पाहिजेत पण भाजपा ओबीसी समजातील विद्यार्थ्यांना संधींपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न करत आहे.

जातीनिहाय जनगणना महत्त्वाची

ओबीसी समाजाने भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान करून केंद्रात व राज्यात सत्ता दिली पण भाजपा व देवेंद्र फडणवीस हेच ओबीसींच्या न्याय हक्काचे खरे मारेकरी आहेत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी समांतर आरक्षण चालवले जात आहे. युपीएससीची परीक्षा न घेताच एका विशिष्ट समाजातील मुलांना थेट सहसचिव पदावर नियुक्ती देऊन ओबीसी व इतर मागास जातींच्या मुलांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणही भाजपा व फडणवीस यांच्या आडमुठेपणामुळेच गेले. राज्य ओबीसी आयोगाची स्थापन केली नाही. भाजपाला आरक्षणच नको असल्याने ते विविध मार्गाने ते संपवण्याचे काम करत आहे. जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय या ओबीसी समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळणार नाहीत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...