आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वबळाच्या घोषणेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली होती. महाविकास आघाडीच्या पाठीत सुरा खुपसला जात आहे. ती बिघाडीच्या मार्गाने जात असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. आता या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीमधील गोविंद बाग येथील निवासस्थानी शरद पवारांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीत सुरु असेलल्या कुरबुरींवरही भाष्य केले आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसे आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो'. पवारांनी पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असुनही त्यांना अशा भाषेत बोलल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची घोषणा केली आहे. या विषयावर पवार म्हणाले की, 'प्रत्येक पक्षाला आपली राजकीय भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आम्ही सरकार एकत्र चालवतो मात्र याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवतोय असा होत नाही. पक्ष वेगळेच चालवतो. यामुळे काँग्रेसने राजकीय भूमिका मांडली. शिवसेनेने मांडली, आमच्या पक्षातून जयंतरावांनी मांडली. प्रत्येकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे.'
काय म्हणाले होते नाना पटोले?
नाना पटोले यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. 'पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे केली जात नसल्याचे ते म्हणाले होते. तसेच उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपते' असेही पटोले म्हणाले होते. या सर्वांवर शरद पवारांनी आज भाष्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.