आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसानपुत्रांचा एल्गार:शेतकरी सहवेदनेसाठी 13 ते 19 मार्च दरम्यान  किनगाव ते धुळे निर्धार पदयात्रा; जाचक कायदे रद्द करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या पायातल्या अन्यायी कायद्याच्या बेड्या सरकारने तोडाव्यात यासाठी किसान पुत्र आंदोलनातर्फे शेतकरी सहवेदना आणि निर्धार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.

शेतकरी सहवेदना आणि निर्धार पदयात्रा यंदा किनगाव (जळगाव) ते धुळे अशी 13 ते 19 मार्च या कालावधीत निघणार आहे. हे अंतर जवळपास 110 किलोमीटर आहे. यात्रेच्या मार्गात चोपडा आणि अंमळनेर ही तालुक्याची गावे येतात. डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) हे यात्रेचे मुख्य संयोजक आहेत व सुभाष कच्छवे (परभणी) हे त्यांना सहकार्य करीत आहेत.

हाच मार्ग का?

2021 मध्ये औंढा नागनाथ ते चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) अशी सुमारे 225 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. 2022 मध्ये पानगाव (हुतात्मा रमेश मुगे यांचे गाव) ते अंबाजोगाई अशी 35 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. या वर्षी किनगाव (दिवंगत सहकारी कडू आप्पा पाटील यांचे गाव) ते धुळे (दिवंगत रवी देवांग यांची कर्मभूमी) अशी पदयात्रा निघणार आहे. पहिली पदयात्रा मराठवाड्यातून निघून विदर्भात गेली होती. दुसरी मराठवाड्यात निघाली. तिसरी खान्देशात निघणार आहे. कडू आप्पा पाटील हे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते, किसानपुत्र आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी जळगाव येथे शिबिर घेतले होते. शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे अशी त्यांना तळमळ होती. रवी देवांग हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱयांचा गळफास ठरलेल्या कायद्यांचे सुरक्षा कवच बनलेल्या परिशिष्ट नऊची जाहीर होळी केली होती. त्यात त्यांच्या सोबत कडू आप्पाही होते. त्या बद्दल त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शेवटी न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले होते. शेतकरीविरोधी कायद्यांच्या लढाईला तीव्र करणारे हे दोघे असल्यामुळे किनगाव ते धुळे अशी पदयात्रा काढली जात आहे.

पदयात्रेचा कार्यक्रम

पदयात्रा 13 तारखेला सकाळी 9 वाजता कडू आप्पा यांना श्रद्धांजलीची सभा घेऊन प्रारंभ होईल. धानोरा करीत अडावदला मुक्काम करेल. 14ला बारडी वरून चोपड्याला जाईल. 15ला निमगव्हाण करून पाटोंदा येथे रात्रीचा मुक्काम करेल. 16 तारखेला गडखांब मार्गे अंमळनेरला पोहचेल. 17 मार्चला दुपारी जानवे करून रात्री नवलनगर येथे मुक्काम करेल. 18 ला वणी बु. करीत फागणे येथे मुक्काम करेल. शेवटचा टप्पा 19 मार्चला फागणे ते धुळे हा राहील. धुळ्यात या यात्रेचा समारोप होईल. पदयात्रेत सभा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिक आणि किसानपुत्रानी व्यवस्था केली आहे.

यात्रेत सहभागी कोण?

यात्रेत खालील शेतकरी आणि किसानपुत्र पूर्णवेळ सहभागी होणार आहेत. 1) रामकिशन अप्पा रुद्राक्ष, 2) निळकंठ डांगे (हिंगोली), 3) बालाजी आबादार 4) विठ्ठलराव डांगे (नांदेड), 5) कालिदास आपेट 6) चौधरी सर (बीड), 7) सतीश गलांडे (परभणी), 8) हृतगंधा देशमुख (जळगाव), 9) शामराव धावडे (अमरावती) 10) राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), 11) सुभाष कच्छवे (परभणी) शिवाय या गावावरून त्या गावापर्यंत सहभागी होणारे वेगळे राहतील, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...