आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणूक:सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मत द्या, राज ठाकरेंचे जाहीर आवाहन

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागातील नागरिकांनी महाराष्ट्र एकीककरण समितीच्या उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. 10 जूनला सीमाभागातल्या नागरिकांना संधी आहे. ही संधी दवडू नका असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरेंचे ट्विट

राज ठाकरेंनी ट्विट करून सीमा भागातील नागरिकांना हे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,

"कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

आपला

राज ठाकरे"

राज ठाकरेंनी सीमाभागात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना एकप्रकारे जाहीर पाठिंबाच यातून दिल्याचे बोलले जात आहे.