आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्र लिहित पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षाने जो उमेदपणा दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावा, असेही पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंची भाजप अनुकूल भूमिका?
विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस अगोदर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी केली होती. तेव्हा ती मागणी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी मान्य केली होती. मात्र, यावरुन राज ठाकरेंनाच विरोधकांनी लक्ष्य केले होते. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला पराभव होणार, ही जाणीव भाजपला झाल्यानेच त्यांनी राज ठाकरेंना पुढे करुन सुरक्षितरित्या निवडणुकीतून काढता पाय घेतला, असा आरोप विरोधकांनी केला होता.
मविआवर दबाव आणण्याची खेळी
आता पुन्हा राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा दाखला देऊन पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागमी मविआ नेत्यांकडे केली आहे. दुसरीकडे, भाजप आणि स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या दोन निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपने मविआवर दबाव टाकण्यासाठी पुन्हा राज ठाकरेंचे कार्ड पुढे केल्याचे बोलले जात आहे.
तेव्हा फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांवर जारी केलेल्या पत्रात राज ठाकरेंनी म्हटले आहे की, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान केले होते. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती
राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या 2 आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधींचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही.
भाजपला इशाराही दिला
मात्र, पोटनिवडणुकीतील उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही, असा सूचक इशाराही राज ठाकरेंनी पत्रातून दिला आहे.
कसबा पेठ मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र, कर्करोगाशी झुंजताना त्यांचे निधन झाले. मात्र, कसबा पेठ येथून त्यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी खंत व्यक्त केली. खंत व्यक्त करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. यावरुनच राज ठाकरे यांनी पत्रातून भाजपला सूचक इशारा तर दिला नाही ना, असे बोलले जात आहे.
राज ठाकरेंचे पत्र
संबंधीत वृत्त
हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार:म्हणाले- टिळकांवर अन्याय, ब्राम्हण समाज नाराज; भाजपची डोकेदुखी वाढणार
हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोपही यावेळी केला. आनंद दवे सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.