आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे 2 पावले मागे गेले असते, आपल्याच पक्षातील आमदारांच्या व्यथा एकून घेतल्या असत्या, तर आज शिवसेनेचे दोन मेळावे झाले नसते, अशी खंत शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.
रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे आज प्रत्येकाला भेटताय. मात्र आपले आमदार, मंत्री व शिवसैनिकांच्या व्यथा त्यांनी यापूर्वी जाणून घेतल्या असत्या तर त्यांच्यावर आजही वेळ आली नसती. शिवसेनेचे आज दोन मेळावे होत आहे. हे दृश्य आनंददायी, अभिमानास्पद अजिबात नाही. हे दृश्य मनाला क्लेश देणारे आहे.
राष्ट्रवादीमुळे शिवसेना संपत होती
रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतरही मंत्रालयात फार कमी वेळ बसत असत. मुख्यमंत्रीपदी असूनही ते मातोश्रीवरच वेळ घालवत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंत्रालयात बसत. पवार आपल्या मंत्र्यांना, कार्यकर्त्यांना निधीचे वाटप करत होते. अनेक जिल्ह्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना छदामही मिळत नव्हता. तर, राष्ट्रवादीच्या माजी खासदारांना कोट्यवधींची निधी मिळत होता. राष्ट्रवादी वाढवण्याचे काम अजित पवार करत होते. त्यामुळे शिवसेना मात्र संपत होती.
मी आमदारांची समजूत काढली असती
रामदास कदम म्हणाले, राष्ट्रवादीकडून शिवसेना नेत्यांचे खच्चीकरण झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले. तरीही उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास तयार नव्हते. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर मी स्वत: आमदारांची समजूत काढण्यासाठी गुवाहाटीला जाण्यास तयार होतो. मात्र, उद्धव ठाकरेंच्या अशा भूमिकेमुळे ते जमल नाही. आज शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मीदेखील भाषण करणार आहे. यावेळी सर्व सत्य जनतेला सांगणार आहे.
गद्दार कोण?
रामदास कदम म्हणाले, शिवसेनेवर अशी वेळ का यावी, याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. ते आता उठसूठ गद्दार, गद्दार म्हणत आहेत. 50 खोके घेऊन आमदारांनी गद्दारी केली, असा आरोप करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंना बदनाम करण्यासाठीच असे आरोप करण्यात येत आहे, हे कोणीही सांगेल. उद्धव ठाकरेंनी किमान गद्दाराची व्याख्या तरी सांगावी. मी ५२ वर्षे शिवसेनेसाठी काम केले. बाळासाहेबांनी मला नेता केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणाचा कोथळा बाहेर काढणार, हे तरी मला कळू दे.
उद्धव ठाकरेंनी माझे भाषण बंद केले
रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असताना दसरा मेळाव्यात मला भाषण करू दिले जात होते. शिवसेनेची बुलंद तोफ अशी माझी ओळख होती. मात्र, बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील माझे भाषण बंद केले. त्यानंतर षण्मुखानंदसारख्या सर्वच सभागृहातून माझे भाषण बंद केले. ते का बंद केले, हे अजूनही मला कळलेले नाही. ते शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे.
उद्धव यांचा शिवसैनिकांनाही उपयोग नाही
रामदास कदम म्हणाले, बाळासाहेबांचा पुत्र मुख्यमंत्रीपदावरून खाली आले याचे दु:ख मला नक्कीच आहे. मात्र, उद्धव यांचा मंत्र्यांनाच काही उपयोग होत नव्हता तर शिवसैनिकाला काय उपयोग होणार. आमदार, खासदार यांच्यासोबतच नगरसेवक, पदाधिकारीही आपल्याला सोडून का जात आहेत, याचा विचार उद्धवींनी करावा. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरेंना जहाल भाषा शोभत नाही. त्यांचे बोलणे म्हणजे बोलीच भात आणि बोलाचीच कढी असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.