आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नरिमन पॉइंट येथील राज्याच्या मंत्रालयातील सरकारी उपाहारगृहाची मंत्री कार्यालय तसेच अधिकारी कार्यालयाकडे मोठी थकबाकी आहे. ही उधारी आठवड्यात द्यावी, अन्यथा चहा, नाष्टा यापुढे पुरवणे शक्य होणार नाही, असा इशारा गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.
मंत्रालयाच्या तळमजल्यावर सुसज्ज उपाहारगृह आहे. हे उपाहारगृह शासकीय आहे. तसेच येथील कर्मचारी सरकारी कर्मचारी असून उपाहारगृहाला अनुदान देण्यात येते. राज्य मंत्रिमंडळात सध्या कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे ४३ मंत्री आहेत. तर मुख्य सचिव, त्या त्या विभागाचे सचिव, सहसचिव आणि उपसचिव यांची शेकडो कार्यालये मंत्रालयात आहेत.
मंत्री आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे बैठका असतात, तेव्हा सरकारी उपाहारगृह खानपान सेवा पुरवते. त्याची देयके नंतर संबंधित विभागांनी चुकती करायची असतात. उपाहारगृह हे सामान्य प्रशासन विभागाकडून चालवले जाते. नवे सरकार आल्यानंतर देयके मोठ्या प्रमाणात थकीत राहिली आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढले आहे. त्यात मंत्री कार्यालयांना हा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महालेखापाल यांनी मागच्या वर्षी केलेल्या लेखापरीक्षणात देयके प्रलंबित राहिल्याबाबत शेरा मारला होता. सामान्य प्रशासन विभागाने प्रलंबित देयकांचा नुकताच आढावा घेतला. त्यामध्ये अनेक विभागांची देयके थकीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिपत्रक काढून देयके अदा करण्यास सुचवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.