आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी नुकतेच कोल्हापूर येथे केले. तसेच, शिर्डीचे साईबाबा हे संत होऊ शकतात, फकिर होऊ शकतात. मात्र, देव होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केले होते. या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, यावरुन त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.
निवडणुकांसाठी वादग्रस्त वक्तव्ये
रोहित पवार यांनी ट्विट करुन या दोन्ही बाबांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध. पण, यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय.
भोंदूंच्या आडून ट्रायल काय घेता?
भाजपचे नाव न घेता रोहित पवार म्हणाले, भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावे.
मुख्य प्रश्नांवरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न
पुढे रोहित पवार म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधाने करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचे पहिल्यापासूनच धोरण राहिल आहे.
भ्रष्टाचार, बेरोजगारीवर बोलावे
रोहित पवार म्हणाले की, पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.
संबंधित वृत्त
वादग्रस्त:नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल; कालीचरण महाराज यांची मुक्ताफळे
सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.