आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवाहन केले आणि राज ठाकरेंनी जरी पत्र लिहले तरीही कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुका होतीलच, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी तिथे निवडूक झाली होती. पंढरपूरला आणि नांदेडला देखील पोटनिवडणूक झाली होती. तिथे भाजपने उमेदवार दिला होता. तसेच, राज्यातील जनमत आता भाजपच्या विरोधात आहे. कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची भीती आहे. म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले जात आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर हल्ला झाला. अदानींवरील हल्ला हा भाजपच्या ‘रिझर्व्ह बँके’वर हल्ला आहे, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
अदानीच भाजपचे मुख्य अर्थ पुरवठादार
आज सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचे कारण एकच, अदानी व मोदी. अदानी व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भारतीय अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लूटमार सिद्ध होऊनही भाजप गप्प आहे. यामुळे ते सिद्धच झाले. अदानी म्हणजे भाजप याचा अर्थ स्पष्ट आहे. अदानी यांच्याकडे भाजपचा पैसा गुंतला आहे. तेच भाजपचे मुख्य अर्थ पुरवठादार आहेत.
अदानी म्हणजे भारत, हा भारतमातेचा अपमान
संजय राऊत म्हणाले, मुळात गौतम अदानी व त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य तकलादू पायावरच उभे होते. अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या एका फुंकरीने ते कोसळले. त्याचा फटका देशाला बसला. अदानी यांच्या आर्थिक साम्राज्याचा मुखवटा ओढणे हा देशावरचा हल्ला असे आता सांगितले जात आहे. अदानी म्हणजेच भारत असे आता बोलले गेले. हा भारतमातेचा अपमान आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची लक्तरे
संजय राऊत म्हणाले, अदानी प्रकरणामुळे जगात भारतीय अर्थव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. एखाद्दुसऱ्या उद्योगपतींच्या करंगळीवर एखाद्या महान देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असावा हे हास्यास्पदच होते, पण गेल्या सात-आठ वर्षांत हा पोकळ डोलारा उभा राहिला. ही करंगळी अदानी यांची होती की प्रत्यक्ष आपले पंतप्रधान मोदी यांची हाच संशोधनाचा विषय आहे.
नक्की भारत किती, भारत कोणाचा?
संजय राऊत म्हणाले, सध्या ‘मोदी म्हणजेच भारत’ असे सांगितले जात असतानाच उद्योगपती गौतम अदानी यांनी स्वतःची तुलना भारताशी केली व आपल्या फसवणुकीवर झालेला हल्ला हा भारतावरील हल्ला असल्याचा दावा केला. त्यामुळे नक्की भारत किती व भारत कोणाचा? असा प्रश्न पडला आहे. गौतम अदानी कोण? हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी व त्यांच्या उद्योग साम्राज्याची श्रीमंती वाढत गेली.
भाजप गप्प का?
संजय राऊत म्हणाले, अदानी हे विमानतळापासून बंदरे, सार्वजनिक उपक्रमांचे मालक बनले. उद्योगाच्या सर्वच क्षेत्रांत ते घुसले व कमी काळात शिखरावर गेले. शेवटी शेवटी त्यांनी मुंबईतील ‘धारावी’ हा पुनर्वसन प्रकल्पही स्वतःच्याच पंखाखाली घेतला. देशातील विकासाच्या प्रत्येक विटेवर व मातीच्या कणावर अदानींचेच नाव असावे याची काळजी मोदींचे सरकार घेत राहिले व अदानींची श्रीमंती वाढावी म्हणून देशाच्या सार्वजनिक बँका, विमा पंपन्या अदानींना हजारो कोटी रुपये देत राहिल्या. पण हे साम्राज्य तकलादू पायावर उभे होते व अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेच्या एका शोधनिबंधाने अदानींचे राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडले. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा यानिमित्ताने समोर आला व विरोधकांच्या घरी पाच-दहा लाखांच्या व्यवहारासाठी ईडी, सीबीआयची पथके पाठवणारे भाजप सरकार इतक्या मोठ्या घोटाळय़ावर गप्प आहे.
LICच्या पैशांचे काय होणार?
संजय राऊत म्हणाले, मुंबई व दिल्लीच्या तुरुंगात ‘ईडी व सीबीआय’ने अनेक प्रतिष्ठत उद्योगपतींना पाच-पंचवीस कोटींच्या व्यवहारासाठी डांबून ठेवले आहे. सर्व पार्श्वभूमीवर गौतम अदानी व त्यांच्या कंपन्यांनी केलेले व्यवहार हे धक्कादायक आहेत. मनी लाँडरिंग, शेल कंपन्यांचे व्यवहार त्यात आहेत. अदानी समूहावर भारतीय बँकांचे दोन लाख कोटींच्या वर कर्ज आहे. त्यात सर्वाधिक कर्ज भारतीय स्टेट बँकेचे आहे. आपल्या संपत्तीची किंमत वाढवून, चढवून अदानी समूहाने हे कर्ज मिळवले व कर्ज मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात आले. एलआयसीत मध्यमवर्गीयांचा पैसा सर्वाधिक गुंतला आहे. याच एलआयसीचे 55 हजार कोटी अदानी समूहात गुंतले व आता अडकले आहेत. या पैशांचे काय होणार?
जबाबदारी मोदी सरकारचीच
संजय राऊत म्हणाले, गौतम अदानी व त्यांच्या साम्राज्याचा पाया पंतप्रधान मोदी यांनी घातला हे कोणीच नाकारणार नाही. उद्योगपती व त्यांचे साम्राज्य वाढवणे यात चूक नाही, पण ते साम्राज्य म्हणजे देश असा देखावा उभा करणे हा अपराध. टाटा, बिर्ला, बजाज, हिंदुजा यांनी स्वतःला कधीच ‘राष्ट्र’ मानले नाही. त्यांच्या उद्योगांतही चढउतार झाले तेव्हा हा राष्ट्रावर हल्ला असल्याचे सांगितले नाही. अदानी यांनी स्वतःला राष्ट्र मानले. मोदी व अदानी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे या लोकांनी ठरवले. तेव्हा अदानींमुळे देशाचे सध्या जे नुकसान सुरू आहे त्याची जबाबदारी मोदींच्या सरकारनेच घ्यायला हवी.
प्रकरण वाटते तितके सोपे नाही
संजय राऊत म्हणाले, अदानी प्रकरण वाटते तितके सहज नाही. ते फक्त कॉर्पोरेट युद्ध नाही. भारतीय जनता पक्ष, त्यांचे आर्थिक व्यवहार, लोकशाहीचा गळा घोटून पैशाच्या ताकदीवर सत्ता टिकवण्याच्या प्रवृत्तीवर झालेला हा हल्ला आहे. भविष्यात असे आणखी हल्ले होतील. त्याचे परिणाम 2024 ला दिसतील. भारतमातेच्या उदरात काय दडले आहे, याची ही एक झलक आहे.
संबंधीत वृत्त
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी:अदानी घोटाळ्याची RBI, सेबीने चौकशी करावी; काँग्रेसतर्फे उद्या राज्यभरात आंदोलन
अदानी उद्योग समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.